Marathi e-Batmya

आमदार रवि राणा यांचा खोचक टोला, मुख्यमंत्री असताना काही करू शकले नाहीत आता तर…

राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना हनुमान चालीसावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न भाजपा समर्थक रवि राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर अमरावतीतीलच अचलपूरचे शिंदे समर्थक आमदार बच्चु कडू यांनाही शिंदे सरकारला पाठिंबा देण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप करत एकच खळबळ माजवली. आता दोन दिवसीय विदर्भाच्या दौऱ्यावर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे हे आले असताना रवि राणा यांनी खोचक शब्दात टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्यावरून आमदार रवि राणा म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुख्‍यमंत्री असताना विदर्भात कधी तोंड दाखवले नाही, कोरोना काळात कधी मंत्रालयात गेले नाहीत. कधी विदर्भातील शेतकऱ्यांच्‍या बांधावर पोहोचले नाहीत आणि आज पावसाळ्यातील बेडकासारखे बाहेर निघाले आहेत. विदर्भाच्‍या दौऱ्यावर ते आले आहेत.

रवि राणा पुढे बोलताना म्हणाले, अमरावतीतही ते येणार आहेत. मुख्‍यमंत्रीपदावर असताना महाराष्‍ट्राला वाऱ्यावर सोडून मातोश्रीवर बसले होते, तेव्‍हा महाराष्‍ट्रातील जनता त्रस्‍त होती. आता पुन्‍हा विदर्भात पावसाळ्यातील बेडकासारखे येऊन मतांची भीक मागत आहेत. लोकांची दिशाभूल करताहेत, अशी टीका केली.

रवि राणा म्‍हणाले, उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवा, तुम्‍ही मुख्‍यमंत्री असताना काही करू शकले नाही, आता तर तुमचे चाळीस आमदारही सोडून गेले. सत्ता गेली. शिवसेना पक्ष गेला. फक्‍त हनुमान चालिसाचा विरोध करून एका खासदार, आमदाराला तुम्‍ही तुरुंगात टाकले, म्‍हणून ही स्थिती ओढवली आहे. जो प्रभू श्रीरामाचा नाही, हनुमानाचा नाही, तो कुण्‍या कामाचा नाही, त्‍यामुळे विदर्भात येऊन तुम्‍ही कितीही थापा मारल्‍या, तरी तुम्‍ही काय आहात, तर पावसाळ्यातील बेडूक आहात, हे विदर्भातील जनता ओळखून आहे, अशी खोचक टीका केली.

दरम्यान, हनुमान चालिसावरून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणारे पोस्टर राणा दांम्पत्यांकडून लावण्यात आले होते. मात्र ठाकरे समर्थकांनी राणा दांम्पत्याने लावलेले पोस्टर फाडून टाकले.

Exit mobile version