Marathi e-Batmya

बागेश्वर बाबासमोर नतमस्तक होत देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन म्हणजे…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, अनाचारी नेते भयभीत आहेत असे सांगतानाच ,काँग्रेस नेते राहुल गांधी यांना देशातील जनता आणि काँग्रेस पक्ष सुद्धा गांभीर्याने घेत नाही असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस जर गांभीयाने घेत नसेल तर त्यांना मी का गांभीर्याने घेऊ, असा प्रतिप्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आज पुणे येथे वादग्रस्त बागेश्वर धाम पं. धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या रामकथेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली.

देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे या देशातील भ्रष्टाचारी, दुराचारी, अनाचारी नेते भयभीत आहेत. या देशातील सामान्य जनतेला विचाराल तर ते नरेंद्र मोदींना देशाचे रक्षक, देशाचे यशस्वी नेतृत्त्व करणारे आणि गरिबांसाठी पोटतिडकीने काम करणारे नेते मानतात. राहुल गांधींना कुणीच गांभीर्याने घेत नाही अशी टीकाही केली.

आज भाजपाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक प्रभारींची एक बैठक झाली, त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्व बुथवर भाजपा मजबूत करायची आहे. जेथे भाजपा लढेल तेथे भाजपा उमेदवार तर अन्य ठिकाणी महायुतीतील नेते निवडून आणायचे आहेत. आगामी लोकसभा निवडणूक ही भाजपासाठी नाही, तर भारतासाठी महत्त्वाची आहे. २०२४ ते २०२९ या काळात भारताच्या वाटचालीतील महत्त्वाची वर्ष राहणार आहेत. पंढरपूरला कार्तिकीच्या पूजेला काय मागणार आणि आषाढीच्या पूजेला केव्हा जाणार, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, कार्तिकीला काय मागणार हे उद्या सांगेन आणि आषाढीला केव्हाही जाता येतं, यंदा सुद्धा मुख्यमंत्र्यांसोबत मी जाऊ शकतो असे स्पष्ट केलं.

बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, भारत जागृत झाला, तर संपूर्ण विश्व जागृत होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्त्वात २२ जानेवारी २०२४ रोजी एक इतिहास रचला जाईल. अयोध्येत राममंदिराचे लोकार्पण होईल. जेव्हा लोक सनातनवर टीका करतात, तेव्हा सनातनचा अर्थच त्यांना ठावूक नसतो. रुढीवाद, जातीयवाद म्हणजे सनातन नाही, तर सनातन म्हणजे अनादी आणि अनंत असा नवा अर्थही सांगितला.

तसेच पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन हा भारताचा विचार आहे, जो सर्वांना जोडणारा आहे आणि ज्यात उच-नीच नाही. प्रभू श्रीरामाची कथा ऐकायला मिळणे, हा आयुष्य सफल करणारा क्षण आहे, अशी आवर्जून दिली.

Exit mobile version