अयोध्येतील प्रभू रामाच्या मंदिराला रामभक्तांनी लाखो करोडो रुपये दान स्वरुपात दिले. सोने चांदीचे दागिने दिले पण भक्तांनी दिलेल्या दान व देणग्यांवर भाजपा व रा. स्व. संघाच्या लबाड बगलबच्चांनी दरोडा टाकला आहे. हा केवळ पैसे अथवा देणग्यांवर टाकलेला दरोडा नसून श्रीरामाच्या नावावर कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेवरच टाकलेला दरोडा आहे. रामाला लुटणाऱ्या भाजपा व रा. स्व. संघाच्या दरोडेखोरांना कठोर शासन झाले पाहिजे, या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने एल्गार पुकारला असून उद्या मंगळवार दिनांक ७ जुलैपासून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे.
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात सकाळी ११ वाजता आंदोलनाचा शंखनाद केला जाणार आहे. या आंदोलनात प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष निलेश ऊर्फ बब्लू खैरे, नाशिक ग्रामीण उत्तरचे जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष भरत टाकेकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ९ जुलै ते १४ जुलै दरम्यान राज्यभर सर्व जिल्ह्यात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह केला जाणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी राम मंदिर, शिव मंदिर अथवा हनुमान मंदिरात हा सत्याग्रह केला जाणार आहे. “मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामाच्या नावावर पैसे खाणाऱ्या भाजपा, आरएसएसच्या लबाड लोकांना सुबुद्धी दे”, अशी प्रार्थनाही यावेळी देवाकडे केली जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे.
