Marathi e-Batmya

संसदेच्या उद्घाटनाला हजर राहणार की नाही शरद पवार यांनी केलं स्पष्ट…

नव्या संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद रंगला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंना संसदेच्या उद्घाटन सोहळ्याला निमंत्रण नसल्याने विरोधी पक्ष मोदी सरकारविरोधात आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाने उद्घाटन सोहळ्याला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशात शनिवारी २७ मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संसद भवन बांधताना विश्वास न घेतल्याचा आरोप मोदी सरकारवर केला आहे.
सातारा येथे रयत शिक्षण संस्थेच्या कौन्सिल बैठकीसाठी शरद पवार येथे आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार म्हणाले, अनेक वर्षापासून मी संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. असा महत्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतलं नाही. आता इमारत तयार झाली आहे.

संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. पण, राष्ट्रपतींनी संसदेचं उद्घाटन करावं, हे सुद्धा मान्य करण्यात आलं नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाची घटना ही विधिमंडळ किंवा दोन्ही गटाऐवजी निवडणूक आयोगाकडून मागवली असल्याचं सांगितलं जात आहे. त्याबद्दल शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर शरद पवार म्हणाले, याचा अर्थ असा आहे, की निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम निर्णय आल्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होईल, असं सांगितले.

Exit mobile version