मुंबई: प्रतिनिधी
राज्यावर कोरोनाचे संकट असून या संकटावर मात करण्यासाठी सर्वचजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. मात्र काहीजण राजकारण करत आहेत. तुम्हाला हवे ते बोला, मात्र मी राजकारण करणार नाही. माझ्यावर महाराष्ट्राचा विश्वास आणि जबाबदारी आहे. तसेच अडचणीच्या, संकटाच्या काळात राजकारण करण्याचे संस्कार आमचे नसून महाराष्ट्राच्या नीतीमत्तेतही नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टोला लगावला.
लॉकडाऊनच्या ४ थ्या टप्प्यात जनतेशी संवाद साधताना विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या राजकारणावर टीका केली.
या कठीण काळात काहीजण पॅकेजची मागणी करत आहेत. मात्र राज्य सरकारने यापूर्वीच रेशन कार्ड असणाऱ्यांबरोबर नसणाऱ्यांनाही धान्य उपलब्ध करून देणे, त्यांना तयार जेवणाची पाकिटे उपलब्ध करून देणे, स्थलांतरीत कामगारांना त्यांच्या घरी पोहोचविण्यसाठी ८० कोटी रूपयांचा खर्च करत त्यांना रेल्वेने घरी पोहोचविले. तसेच त्यांच्या सुविधेसाठी एसटीच्या ३४ हजार फेऱ्या करत त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यत तर त्यांच्या राज्यात जावून सोडण्याची जबाबदारी पार पाडली. शिवभोजन थाळी योजनेच्या माध्यमातून १० लाख नागरिकांना स्वस्त दरात जेवण उपलब्ध करून दिले. इथे कुठे पॅकेज आहे? तरीही या गोष्टी केल्याचे सांगत सर्वप्रथम व्यक्तींना वेळेवर जेवण-धान्य उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याने त्या गोष्टी केल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र काहीजण मोठ मोठ्या पॅकेजची घोषणा करतात. मात्र प्रत्यक्ष ते पॅकेज किती पोकळ असतात याचा अनुभव घेत असल्याने मला पॅकेजची घोषणा करण्यापेक्षा प्रभावी काम करायला आवडत असे सांगत केंद्राच्या कोरोना पॅकेजवर टीका केली.
मुख्यमंत्री म्हणाले, अडचणीच्यावेळी राजकारण करण्याचे संस्कार आमचे नाहीत
