Marathi e-Batmya

अर्थसंकल्पावर उध्दव ठाकरेंची खोचक टीका, गरजेल तो बरसेल काय

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पावर खोचक टीका करत गरजेल तो बरसेल काय अशी टीका करत महाविकास आघाडी सरकारने यापूर्वीचे दोन-तीन अर्थसंकल्प मांडले होते ते अभ्यासपूर्ण होते. आजचा अर्थसंकल्प म्हणजे गाजर का हलवा आहे अशी खोचक टीकाही केली. तसेच समाजातील सर्व घटकांना मधाचे बोट लावण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाल्याचा आरोपही केला.

उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसरात अर्थसंकल्पाबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात करोनाचे संकट होते आणि केंद्र सरकार आमच्या बाजूचे नव्हते. प्रत्येकवेळी २५ हजार कोटींची जीएसटी थकबाकी असायची. आता सहा महिने झाले, महाशक्तीचा पाठिंबा असलेले सरकार आले आहे. पण, राज्य कारभार कसा चालू आहे, हे सर्व पाहत आहेत.

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील योजनांचेच नामांतर करून आजच्या अर्थसंकल्पात योजना मांडल्या आहेत. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना महाविकास आघाडीनेच मुंबईत सुरू केली होती. आता ती राज्यभरात राबवण्यात येणार आहे. अनेक घोषणा झाल्या आहेत आता त्या प्रत्यक्षात कधी येतात ते पाहू.

शेतकऱ्यांना सरकारने मदत वाढवली पण त्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळेल याबद्दल काहीच वाच्यता नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडताना दीपक केसरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख केला. सत्तेत येत असताना मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी घोषणा केली होती. पण आठ-नऊ वर्षांत त्याचा पत्ताच नाही, असेही टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.

Exit mobile version