Marathi e-Batmya

अखेर पदाचा राजीनामा….पण पुढचे सरकार भाजपाच्या नेतृत्वाखालील

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीत राज्यातील जनतेने पुन्हा एकदा विश्वास दाखविला. परंतु निवडणूकीला महायुती म्हणून सामोरे जावूनही शिवसेनेने चर्चेची दारे बंद केली. त्यामुळे कठीण परिस्थिती असतानाही राज्य सरकार स्थापन करता आले नसल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करत कार्यकाल संपत आल्याने राजीनामा राज्यपालांना सादर केला आहे. राज्यात नव्या निवडणूका होणे चांगले नसल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असून राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालीच सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला.
जनतेने पाच वर्षे संधी दिली त्याचे सोने करायचा प्रयत्न केला. मुंबईत रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचे काम केले. तसेच महाराष्ट्रातही अनेक विकासाची काम झाले. आमचा मित्र पक्ष सोबत होता की नाही ते तुम्हाला माहीत असल्याचे सांगत राज्यात महायुतीला बहुमत दिले. १६०पेक्षा जास्त जागा दिल्या. भाजपा १०५ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. लढलेल्यापैकी ७० टक्के जागा जनतेने आम्हाला दिल्या. विकासकामामुळे आम्हाला निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात अवकाळी पावसांमुळे शेती पिके चांगली येवूनही अधिकच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत स्थिर सरकार स्थापन होणे गरजेचे होते. पण ते शक्य झाले नाही. त्यामुळे जेवढे शक्य होते तितके चांगले निर्णय घेतले यापुढेही घेवू असे त्यांनी सांगितले. शिवसेना, विरोधक आणि प्रसारमाध्यमांचे त्यांनी आभार मानले.

भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी कोणताही घोडेबाजार करणार नाही. तसेच ज्यांनी अशा पध्दतीचे आरोप केले. त्यांनी पुरावे द्यावे असे खुले आवाहन देत भाजपाच्या नेतृत्वाखालीलच सरकार राज्यात सत्तेवर येणार असल्याचा दावा त्यांनी शेवटी केला.

Exit mobile version