मुंबईः प्रतिनिधी
निवडणूकीच्या निकालावर आता काही बोलणार नाही. त्याचे विश्लेषण नंतर करणार आहे. मात्र राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन करण्याइतके संख्याबळ भाजपा-शिवसेनेला मिळाले आहे. तरीही आमच्याविरोधात बंडखोरी करून विजय मिळविलेल्या १५ बंडखोर विजयी उमेदवारांकडून सरकार स्थापनेसाठी मदत करणार असून ते संपर्कात असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
निकालानंतर संध्याकाळी भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
तिकिट वाटपावेळी काहीजणांनी शिवसेनेच्या विरोधात तर काहीजणांनी भाजपाच्या विरोधात बंडखोरी केली. पण ते सर्व बंडखोर आमचेच आहेत. त्यापैकी १५ जणांशी संपर्क झाला असून त्यांनी सरकारला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या संख्येत वाढ ही होवू शकते असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्याचबरोबर शिवसेनेबरोबर जे ठरलेय त्यानुसारच आम्ही पुढे जाणार आहोत. आमच्यात काय ठरलय ते योग्यवेळी जनतेसमोर उघड करू असे सांगत उध्दव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले.
युती सरकारला मदत करण्यासाठी १५ बंडखोर संपर्कात
