Marathi e-Batmya

देवेंद्र फडणवीस यांची टीका, व्होट जिहाद करणार असतील तर…

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या जोरात सुरु आहे. त्यात भाजपा प्रणित महायुती आणि पुरोगामी विचारांच्या महाविकास आघाडीकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्याच मुस्लिम उलेमाचे नोमानी यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडिओवरून भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस, शिवसेना उबाठावर निशाना साधत व्होट जिहाद करत असल्याची टीका केली. जर त्यांच्याकडून व्होट जिहाद करण्यात येणार असेल तर आम्हाला धर्मयुद्ध पुकारावे लागेल असा इशारा दिला.

देवेंद्र फडणवीस हे नागपूरात बोलताना म्हणाले की, धर्माच्या आधारे काँग्रेस आणि शिवसेना उबाठा हे व्होट जिहाद करत आहेत. हे खेदजनक आहे. निवडणूकीच्या काळात इतके लांगुलचालन यापूर्वी मी कधी बघितले नव्हते असे सांगत अल्पसंख्याक समाजाची मते मिळविण्यासाठी महाविकास आघाडी काम करत असेल तर त्याविरूद्ध सगळ्यांना एक व्हावे लागणार असून धर्मयुद्ध पुकारावे लागेल असा इशाराही यावेळी दिला.

देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, उलेमा कौन्सिलने महाविकास आघाडीला १७ मागण्यांचे पत्र दिले असून या मागण्यांमध्ये त्यात १० टक्के आरक्षण, शिवाय देशात आणि राज्यात दंगे भडकविण्याचा आरोप असलेल्या आरोपींची सुटका, त्यांच्यावरील केसेस मागे घेणे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणे अशा मागण्या त्यात आहे. या मागण्या महाविकास आघाडीने मान्य केल्यानंतर उलेमा कौन्सिलने पाठिंबा जाहिर केला आहे. मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी महाविकास आघआडी कुठल्या स्तराला जाऊ शकते हे यातून दिसून येते, देशावर हल्ला करणाऱ्यांना तुरुंगातून सोडविण्याची मागणी केल्यानंतर सुद्धा ती मान्य केली आहे. एकप्रकारे काँग्रेसचे समर्थन दहशतवादी कृत्याला असल्याचे दिसून येते अशी टीका करत महाविकास आघाडीचे एकप्रकारे व्होट जिहाद सुरु आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने सावध राहुन मतदान करण्याची वेळ आली असल्याचेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नोमाणीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात भाजपाला मतदान करणाऱ्या व्यक्तींचा शोध घ्या आणि त्याचा दवापाणी बंद करा, सामाजिक बंदी घाला असे आवाहन करण्यात आले आहे. स्वतःला पुरोगामी म्हणणारे महाविकास आघाडीचे लोक यावर एक शब्द बोलत नाहीत. एका धर्माला हाताशी धरून ज्या पद्धतीने महाविकास आघाडी राजकारण करत आहे. त्याला आम्ही निश्चितपणे उत्तर देऊ असेही यावेळी सांगितले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, मुस्लिम समाजाला धमकावणे म्हणजे एकप्रकारचा गुन्हा आहे. किरिट सोमय्या यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक है तो सेफ है अशी दिलेली घोषणा योग्यच होती. आज महाविकास आघाडी आणि काँग्रेस जाती-जातीत विभाजित करत असल्याचा आरोप करत मुस्लिम समाजाला जवळ करत निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीकडे दुसरा मुद्दा नसल्याने विकासावर बोलत नाही तसेच विकासाच्या मुद्यावर बोलत नसल्याची टीकाही यावेळी केली.

Exit mobile version