Marathi e-Batmya

जर भाजपा शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम

मुंबईः प्रतिनिधी
युती मला तोडायची नाही. तसेच ती तुटावी म्हणून कोणतेही पाऊल उचलणार नाही. परंतु भाजपा जर दिलेला शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सांगत एकप्रकारे मुख्यमंत्री शिवसेनेचाच यावर आज शिक्कामोर्तब केले.
वांद्रे येथील मातोश्री या निवासस्थानी शिवसेना आमदारांच्या बोलाविलेल्या बैठकीत ते बोलत होते.
आपल्या पक्षाचं निर्माण स्वाभिमानातून झालं आहे. केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळं करत नाही. भाजपनं ताठरपणाची भूमिका सोडावी. जे ठरलं असेल तसं असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन करावा आणि तसं सांगावं असे सांगत चर्चेला बसण्याची तयारी असल्याचेही त्यांनी आमदारांना सांगितले.
मला ठरल्यापेक्षा एकही कण जास्त नको. मला खोटं ठरवायचं असेल तर हे योग्य नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान चुकीचं असल्याचे सांगत त्याबाबत नाराजी त्यांनी व्यक्त केली.
अडीच वर्ष पहिली की नंतरची हा वाद नव्हता पण जर ठरलंच नाही, असे सांगत असतील तर चर्चा काय करायची असा सवालही त्यांनी यावेळी भाजपाला केला.

Exit mobile version