गुरूवारी रात्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील निवासस्थानी देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांची भेट झाल्याचे वृत्त आज बाहेर येताच अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जाणार या चर्चेला सुरुवात झाली. त्याचबरोबर अशोक चव्हाण हे जर भाजपात गेले तर चव्हाण यांचे समर्थक असलेले एकूण पाच आमदार ही भाजपात जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येऊ लागली. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात झाली आहे.
या भेटीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, काँग्रेसचे आमदार भाजपात प्रवेश करणार. काँग्रेसला खिंडार पडणार, या केवळ अफवा आहेत. यात कोणतेही तथ्य नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी या वावडया उठविण्यात येत आहेत. एखाद्या नेत्याची भेट झाली म्हणजे तो नेता काही एका पक्षातून उठून दुसऱ्या पक्षात जात नसतो अशी स्पष्टोक्ती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस विधिमंडळाचे गटनेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करत म्हणाले की, अशोक चव्हाण यांच्याबाबतचे वृत्त दिशाभूल करणारे आहे. अशोक चव्हाण यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे आणि लोकांची दिशाभूल करणारे आहे. चव्हाण हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहेत. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत असा खुलासा केला.
प्रसार माध्यमांनी अशोक चव्हाण यांच्यासारख्या जेष्ठ नेत्याच्या संदर्भाने जबाबदारीने वृत्तांकन करणे अपेक्षित आहे. मात्र गेल्या काही दिवसात अशोक चव्हाण आणि काँग्रेसच्या संदर्भात चुकीच्या बातम्या देऊन जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोप केला.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माझे सहकारी @AshokChavanINC यांच्या संदर्भात माध्यमांमध्ये येत असलेले वृत्त असत्य, खोडसाळपणाचे व लोकांची दिशाभूल करणारे आहे. अशोकरावजी हे भारत जोडो यात्रेच्या नियोजनात सक्रिय आहे. आम्ही एकत्र मिळून महाराष्ट्रात कॉंग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. pic.twitter.com/Hrslrj2Vhv
— Balasaheb Thorat (@bb_thorat) September 2, 2022
