लोकसभा निवडणूकीच्या कालावधीत गोपाळ शेट्टी यांना उमेदवारी न देता त्या मतदारसंघातून केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. तसेच त्यावेळी गोपाळ शेट्टी यांना त्यांचे राजकीय पुर्नवसन करण्यात येणार असल्याचे आश्वासनही भाजपाने दिले. त्यानंतर राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवरील नामनिर्देशित जागा आणि निवडणूकाही झाल्या. मात्र गोपाळ शेट्टी यांचे राजकिय पुर्नवसन करण्यात आले नाही. त्यातच राज्यातील विधानसभा निवडणूका जाहिर झाल्याने उमेदवारी जाहिर करताना गोपाळ शेट्टी यांचे नाव जाहिर होईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. मात्र तेही झाले नाही. त्यामुळे अखेर गोपाळ शेट्टी यांनी बोरिवली विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
त्यावर भाजपाचे राज्यातील प्रमुख नेते असलेले पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, स्वतः देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांनी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र या सर्वांच्या हाती अपयश आले. तसेच गोपाळ शेट्टी यांनी भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढविण्याचा निर्णयावर ठाम राहिले. उद्या अर्थात सोमवारी ४ नोव्हेंबर दुपारी ३ वाजे पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यामुळे या आधी महायुतीतील पक्षांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बंडखोर उमेदवारांशी संपर्क साधून समजूत काढण्याचा प्रयत्न भाजपामधील नेत्यांकडून सुरु आहे.
भाजपामधील बंडखोरांची समजूत घालण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे आज स्वतः मैदानात उतरले असून त्यांनी आज सकाळी गोपाळ शेट्टी यांची भेट घेतली. ही भेट बरात काळ चालली. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केला असता गोपाळ शेट्टी यांना विचारले की, आपण आपल्या अपक्ष उमेदवारीबाबत ठाम आहात का निवडूक लढविणार का, त्यावर गोपाळ शेट्टी म्हणाले की, पक्षाच्या हितासाठी मी निवडणूकीच्या मैदानात उतरलो आहे. पक्ष हितासाठी जे जे करावे लागेल ते मी करणार आहे. कमळाचे चिन्ह कागदावर असेल नाही तर भिंतीवर असेल पण कमळाबद्दलचा आदर कदापीही कमी होणार नाही. माझ्या हृदयातच कमळ आहे. ते कोणीही काढून घेऊ शकत नाही अशी स्पष्टोक्तीही यावेळी दिली.
यावेळी गोपाळ शेट्टी बोलताना म्हणाले की, मी यापूर्वीच जाहिर केले आहे की, मी पक्ष सोडणार नाही. त्यामुळे मी अपक्ष असल्याचा प्रश्न येतो कुठे असा सवालही यावेळी केला.
