Marathi e-Batmya

फडणवीसांच्या त्या दाव्यावर शरद पवारांचा खोचक टोला, ते तर मी चेष्टेत बोललो

मागील काही दिवसांपासून पहाटेच्या शपथविधीवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांचे नाव घेत त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच अजित पवारांसोबत शपथ घेतल्याचा दावा केला. देवेंद्र फडणवीस यांच्या या दाव्यानंतर शरद पवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, जर त्यावेळी राष्ट्रपती राजवट उठवली गेली नसती तर उध्दव ठाकरे मुख्यमंत्री झाले असते का ? असे सूचक वक्तव्य करत प्रतिप्रश्न केला. त्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी मी त्यांच्याच तोंडून सर्व माहिती काढून घेऊन तुमच्यासमोर ठेवणार असल्याचा इशारा शरद पवार यांना दिला. त्याबाबत शरद पवार यांना यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, मी त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्व नाही. पहाटेच्या शपथविधीसंदर्भात केलेले वक्तव्य हे चेष्टेने केले होते असा खुलासा करत फडणवीसांच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे एमपीएससी विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते.

त्यातच सध्या शिंदे गट ठाकरे गटाने केलेल्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत शिंदे गटाच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदार अपात्र ठरण्याची शक्यता ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणूकीची शक्यता वर्तविली. त्याबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी कशाच्या आधारे हे वक्तव्य केलं हे मी जाणून घेतलेलं नाही. पण मध्यावधी निवडणुका आत्ता लागतील असं मला वाटत नाही. मला तरी आत्ता तशी स्थिती आहे असं वाटत नाही, असे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरील निकाल अजून आलेला नाही. सुनावणीत पहिले तीन दिवस ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडल्यानंतर आता २८ फेब्रुवारीपासून शिंदे गटाचे वकील बाजू मांडतील. मात्र, जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय शिंदे गटाच्या विरोधात गेला आणि आमदार अपात्र ठरले तर राज्यात राजकीय परिस्थिती कोणत्या दिशेला बदलेल? याबाबत चर्चा चालू आहे. यावर गुरुवारी रात्री कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या सूचक विधानामुळे चर्चेची राळ उठली आहे.

Exit mobile version