Marathi e-Batmya

देवेंद्र फडणवीस यांचे खोचक प्रत्युत्तर, मी गृहमंत्री झाल्याने अनेकांची अडचण पण, मला मुख्यमंत्री शिंदेंनी…

गेल्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या पूर्वसंध्येला झालेल्या जाळपोळ आणि हिंसाचार प्रकरणावरून राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्यात आणि देशातही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा मुद्दा आज चर्चिण्यात येत आहे. त्यात दुसरीकडे संजय राऊतांना शुक्रवारी संध्याकाळी बिष्णोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज आल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत झेपत नसेल तर गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची मागणी केली. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी खोचक प्रत्युत्तर दिले.

सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यावर प्रश्न विचारताच देवेंद्र फडणवीसांनी त्यावर खोचक प्रत्युत्तर देताना म्हणाले, मला याची कल्पना आहे की मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. अनेकांना मनातून असं वाटतंय की मी गृहमंत्री राहिलो नाही तर बरं होईल. मी त्या सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितो की मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रीपदाचा कार्यभार दिला आहे. जे जे चुकीचं काम करतील, त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वीही पद पाच वर्षं मी सांभाळलं आहे. यापुढेही जे लोक अवैध काम करतील, त्यांना मी सोडणार नाही, असा इशाराही दिला.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जे जे लोक चुकीचं काम करतील, त्यांच्यावर १०० टक्के कारवाई होईल. मी आजही सांगतो, मी कुणाला घाबरत नाही, कुणाला दबत नाही. जे कायदेशीर आहे तेच वागतो. कायद्यानंच राज्य चालेल, असंही म्हणाले.

संजय राऊत धमकी प्रकरणावर देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, संजय राऊतांना धमकी देणाऱ्या माणसाची ओळख पटली आहे. प्राथमिक माहितीनुसार दारुच्या नशेत त्यानं अशी धमकी दिल्याचं समोर आलं आहे. पण ही प्राथमिक माहिती आहे. याबाबत संपूर्ण तपास केला जाईल आणि कुणीही धमकी दिली असेल तर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रात कुणीही कुणाला धमकी दिली, तरी सरकार आणि पोलीस शांत बसणार नाहीत. अशा कोणत्याही व्यक्तीवर कारवाई होईल, असेही स्पष्ट केले.

Exit mobile version