Marathi e-Batmya

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ

बारामती विधानसभा पोटनिवडणूक लढवण्याची काँग्रेस पक्षाशी ठाम भूमिका होती व कार्यकर्त्यांमध्येही दांडगा उत्साह होता म्हणूनच उमेदवार उभा केला होता पण महाराष्ट्राची राजकीय परंपरा, संस्कृती व सभ्यता लक्षात घेऊन सर्वांच्या विनंतीला मान देत दिवंगत नेते अजित पवार यांना आदरांजली देण्याच्या भावनेतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे. बारामतीतून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे घेतला म्हणजे शेवट केलेला नाही तर हा आरंभ आहे असे स्पष्ट करत देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी जसा जवान लढतो तशाच पद्धतीने काँग्रेसचे कार्यकर्ते संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी लढत आहेत, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बारामती काँग्रेस कार्यालयात जाऊन विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतलेले काँग्रेस पक्षाचे उमेदवार अॅड. आकाश मोरे यांच्यासह उमेदवारी मागितलेल्या इच्छुकांची, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भेट घेतली व त्यांचे अभिनंदन केले. यावेळी पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीरंग चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष लहू अण्णा निवंगने, बारामती शहराध्यक्ष अशोक इंगुले, सरचिटणीस राहुल वाबळे, कमलाकर सातव, गोविंद मिरगे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव वीरधवल गाडे तसेच पुणे जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की,  बारामतीची निवडणूक लढवण्याचा निर्धार केला तेव्हा अनेक स्तरातून काँग्रेसवर टीका करण्यात आली. बारामतीत काँग्रेस पक्षाला उमेदवार तरी मिळेल का? असा उपहास करण्यात आला पण याच बारामतीतून सहा उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, यातून अॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. काँग्रेस विचार व पंजाचे चिन्ह घरोघरी पोहचवणे ही त्यामागची भूमिका होती. काँग्रेस पक्षाचा विचार प्रतिकुल परिस्थितीतही टिकून आहे हे बारामतीच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिले आहे.

शेवटी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करण्यासाठी गुन्हा दाखल करा ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे व या भूमिकेपासून आपण मागे हटलेलो नाही. अजित पवार यांचा पक्ष सत्तेत आहे पण महाराष्ट्रात गुन्हा मात्र दाखल करुन घेतला जात नाही, परंतु काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल केला आहे आणि त्याचा पाठपुरावाही केला जात आहे. अर्ज माघारी घेत असताना कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी या घटनेचे पुढे काय झाले याची माहिती घेतली व आमदार रोहित पवार यांनीही त्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते. आपण घेतलेली भूमिका सोडत नाही, हा काँग्रेसचा बाणा आहे, असेही यावेळी सांगितले.

Exit mobile version