Marathi e-Batmya

शरद पवारांनी केली पोलखोल, वसूलीला कोणी जात नसल्याने ती कर्जमाफी

मागील आठवड्यात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भू-विकास बँकेच्या कर्जदारांचे ९६४ कोटी रूपयांचे कर्ज माफ करत असल्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाचा फायदा शेतकऱ्यांबरोबर कर्मचाऱ्यांनाही होणार असल्याचे जाहिर केले. या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयाची पोलखोल करत कर्जाच्या वसूलीसाठी कोणी जात नाही. तसेच सध्या ही बँकच अस्तिवात नसल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारच्या निर्णयातील हवा काढून घेतली.

पुरंदर येथे आयोजित शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारने भू-विकास बँकेचे कर्ज माफ केल्याचं जाहीर केलं. गेल्या दहा वर्षात भू-विकास बँकेचे कर्ज एकाला तरी मिळालं का? भूविकास बँक अस्तित्वात आहे का? भूविकास बँक होती का? याची माहिती नाही. २५ ते ३० वर्षे झाली बँकेची कोणी कर्ज वसुली केली नाही. राहिलेली वसुली होणार नाही हे कळल्यावर, कर्ज माफी देण्यात आली. ‘लबाडाच्या घरचं आवताण जरी असलं तरी जेवल्याशिवाय खरं नसतं’ असं भाजपावल्याचं काम आहे, अशी टीकाही शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

राज्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यावर बोलताना ते पुढे म्हणाले, अतिवृष्टीने शेतकऱ्यांच नुकसान झालं आहे. त्या नुकसानीची भरपाई केंद्र आणि राज्य सरकारने करावी म्हणून आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू. यासाठी संघर्ष करावा लगाला तर चालेल असा इशाराही दिला.

Exit mobile version