Marathi e-Batmya

पंतप्रधान मोदी यांच्या त्या मुलाखतीवरून जयराम रमेश यांची टीका

मागील काही दिवसांपासून लेह-लडाख मधील शिक्षण तज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्ये सोनम वांगचूक यांनी चीनच्या सैनिकांनी लडाखच्या भारतीय हद्दीतील जमिनीवर मोठ्या प्रमाणावर घुसखोरी केल्याच्या निषेधार्थ उपोषणाचे आंदोलन सुरु केले. त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय संस्थांनीही चीनच्या सैनिकांनी अशा पध्दतीची घुसखोरी केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन नियतकालिक असलेल्या न्यूजवीक ला दिलेल्या मुलाखती दरम्यान चीनचा एकही सैनिकाने भारताची एक इंचही भूमी बळकावली नाही असे एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावरून काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी एक्स या सोशल नेटवर्किंग साईटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, न्यूजवीक या अमेरिकन नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या भ्याडपणाचे प्रदर्शन केले. भारताच्या सार्वभौमत्वावरील चीनच्या वारंवार होणाऱ्या उल्लंघनावर त्यांची एकच टिप्पणी होती की द्विपक्षीय परस्पर संवादातील “असामान्यता” दूर करण्यासाठी भारत-चीन सीमा परिस्थितीला तातडीने संबोधित करणे आवश्यक आहे.

या मुलाखतीवरून जयराम रमेश यांनी टीका करताना म्हणाले की, पंतप्रधानांना चीनला शक्तिशाली संदेश देण्याची संधी होती. तथापि, त्याच्या अप्रभावी आणि कमकुवत प्रतिसादामुळे चीनला भारतीय भूभागावर आपला दावा सांगण्यास आणखी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे अशी टीकाही केली.

पुढे बोलताना जयराम रमेश म्हणाले की, चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया केवळ लाजिरवाणीच नाही तर आपल्या सीमांचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या आपल्या हुतात्म्यांचाही अनादर करणारी आहे असा आरोपही यावेळी केला.

पंतप्रधानांनी १९ जून २०२० रोजी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर ‘ना कोई घुसा है, ना ही कोई घुस आया है’ या विधानाने आणि संरक्षणात आपल्या अपयशाबद्दल देशाला अंधारात ठेवल्याबद्दल १४० कोटी भारतीयांची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही यावेळी जयराम रमेश यांनी केली.

Exit mobile version