Marathi e-Batmya

मंत्री जयकुमार गोरे यांच्या बंधूचा निवडणूकीत पराभव, पण वहिनीचा विजय ठरला चर्चेचा?

राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५  पंचायत समिती निवडणुकीच्या निकालांनी एका बाजूला महायुतीला दिलासा मिळाल्याचे चित्र असले तरी दुसऱ्याबाजूला मात्र अनेक भाजपाच्या मंत्र्यांच्या गडाला चांगलेच हादरे बसल्याचे दिसून आले. त्यापैकीच एक असलेल्या सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत मंत्री जयकुमार गोरे यांना हादरा बसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जयकुमार गोरे यांच्या कुटुंबातच जय-पराजयाचा सामना पाह्यला मिळाला आहे. आपल्या बंधू आणि वहिनीला निवडून आणण्यासाठी जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यात सर्व शक्ती पणाला लावली होती. मात्र, कुकडवाड गटातील मतदारांनी त्यांचे बंधू अरुण गोरे यांना धक्कादायक कौल देत पराभवाची धूळ चारली. मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सख्ख्या भावाचा झालेला हा पराभव भाजपासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

​मात्र, याच वेळी औंध गटातून त्यांच्या वहिनी भारती गोरे यांनी मिळवलेला विजय जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या गटात विजयाचे पारडे शेवटच्या क्षणापर्यंत हेलकावे खात होते. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनीषा फडतरे ४० मतांनी विजयी झाल्याची चर्चा असतानाच, भाजपाच्या आक्षेपानंतर करण्यात आलेल्या फेरमतमोजणीत भारती गोरे यांनी बाजी मारली. भावाचा पराभव आणि वहिनीचा नाट्यमय विजय यामुळे मंत्री जयकुमार गोरे यांची अवस्था ‘एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू’ अशी झाली आहे. एकाच घरातील या दोन निकालांनी मतदारांच्या बदलत्या मानसिकतेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले आहे.

Exit mobile version