जेव्हापासून राजीनामा झाला तेव्हापासून अनेक केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, राज्याचे मंत्री, सत्ताधारी आमदार – खासदार धर्मेंद्र प्रधान यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर लिहित आहेत. जणू काही प्रधान हे निष्पाप आहेत, चांगलं काम करत असतानाही त्यांना राजीनामा द्यावा लागला, त्यांच्यासोबत अन्याय झाला, असा आविर्भाव निर्माण केला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केली.
जयंत पाटील आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, विद्यार्थ्यांनी सरकारविरोधात बंड पुकारले. प्रसंगी पोलिसांचा लाठीचार्ज सहन केला. जवळपास महिनाभर चाललेल्या आंदोलनामुळे काल केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. हे विद्यार्थ्यांच्या लढ्याचे यश आहे. मी विद्यार्थ्यांना आणि राज्यातील शिवभक्तांना सांगू इच्छितो की, धर्मेंद्र प्रधान यांच्याच नेतृत्वाखाली एनसीईआरटीने महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या मराठा साम्राज्याच्या इतिहासाशी छेडछाड केली होती. इयत्ता आठवीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातून इ.स. १७५९ मधील मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा वगळण्यात आला होता. या राजीनाम्यामुळे मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास पुसु पाहणाऱ्यांना धडा शिकवला गेला. असे म्हंटल तर वावग ठरणार नाही असे ते म्हणाले.
