Marathi e-Batmya

जितेंद्र आव्हाड यांची अजित पवार यांच्यावर टीका, स्वतःचा वेगळा पक्ष काढून…

विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. तसेच या दोन्ही बाजूच्या आमदारांकडून प्रचाराच्या निमित्तानेही प्रतिस्पर्धी उमेदवारांवर टीका-टीपण्णी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंब्रा-खळव्याचे आमदार तथा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जितेंद्र आव्हाड यांनी काल एका प्रचार सभेत बोलताना अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले की, अजित पवार गट हा पाकिटमारांची टोळी असल्याची टीका करत हिंमत असेल तर वेगळा पक्ष काढून निवडणूकीला सामोरे जायला हवं होतं असे आव्हानही यावेळी दिलं.

तसेच पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हा देश गांधीचा देश आहे. त्यामुळे हा देश नथुराम गोडसे यांच्या औलादींच्या हातात कधीही जावू देणार नाही असा इशाराही यावेळी प्रत्यक्षरित्या भाजपाला दिला.

मुंब्र्यातील एका प्रचारसभेत बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, अजित पवार यांचा गट हा पाकिट मारांची टोळी आहे. जर तुमच्यात हिंमत होती, तुम्ही मर्दाची अवलाद होतातर स्वतःचा वेगळा पक्ष काढून निवडणूक लढवून दाखवायला हवा होता. मग आम्ही तुम्हाला मर्द समजले असते. ज्या काकांनी देशभरात स्वतःचा पक्ष पसरवला, वाढवला त्याच पक्षाला तुम्ही माझं म्हणत हिसकावून घेतले. पण सामान्य जनतेला सत्य माहित असल्याचेही यावेळी सांगितले.

यावर छगन भुजबळ यांनी टीका करताना म्हणाले की, डॉ जितेंद्र आव्हाड यांनी या आधीही अनेकदा चुकीच्या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे ते अडचणीतही आले होते. हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. माझा त्यांना सल्ला आहे की, शब्द वापरण्याबाबत त्यांनी जाणीवपूर्वक विचार केला पाहिजे. आपण कोणाला चोर म्हणतो, पाकिटमार म्हणतो याचा त्यांनी विचार केला पाहिजे तुमच्याबरोबर जे २० ते २५ वर्षे सोबत होते. त्या सर्वांना हे विधान लागू होते असे सांगत आव्हाड यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

तर दुसऱ्याबाजूला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या रूपाली ठोंबरे यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना म्हणाल्या की, आव्हाड यांच्या डोक्याच्या मेंदूला लकवा मारला आहे. आव्हाड हे घरभेदी असून अजित पवार आणि शरद पवार यांच्या दुरावा निर्माण करण्यात जितेंद्र आव्हाडही हे हि होते. बिनकामाची लोकं लोकप्रतिनिधी असल्याचा कलंक आहेत अशी टीका करत मतदार संघात कोणती विकास कामे केली असल्याचा सवाल करत निवडणूकीच्या भाषणात मर्द माल सारखे शब्द वापरत आहेत. कामावर कधी निवडणूक लढविणार असा सवालही यावेळी केला.

Exit mobile version