Marathi e-Batmya

एकनाश शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर उध्दव ठाकरे यांचे आव्हान

संसदीय राजकारणात काल संध्याकाळी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उध्दव ठाकरे गटाच्या सुनिल प्रभू यांना प्रतोद म्हणून आणि अजय चौधरी यांना देण्यात आलेली गटनेते पदाचीही मान्यता काढून घेत शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यानंतर आज सकाळी आमदार संतोष बांगर यांनीही उध्दव ठाकरेंच्या गटातून थेट एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत दुसरा धक्का दिला. त्यातच आज मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज विश्वासदर्शक ठराव जिंकला. यापार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत म्हणाले, हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा असं आव्हान दिले.

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवनात राज्यातील जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे शिवसेना भवनात पोहोचले होते. यावेळी त्यांनी भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला.

लढायचे असेल तर सोबत राहा असे सांगत भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे. असे खेळ खेळण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयात जाऊ. आम्ही चुकत असू तर जनता आम्हाला घरी बसवेल. तुम्ही चुकत असाल तर जनता तुम्हाला घरी बसवेल असे सांगत हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवाच असे आव्हानही त्यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले.

उद्धव ठाकरेंनी यावेळी घटनातज्ज्ञांना विनंती केली. ते म्हणाले की, आपण घटनातज्ञ आहात. सध्या जे सुरु आहे ते घटनेला धरून सुरु आहे की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडण्याचा प्रकार सुरु आहे त्याबाबत आपली भूमिका स्पष्ट मांडा.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रात जे सुरु आहे त्याबाबत सर्वाना सत्य बोलू द्या. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान असल्याचेही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली होती. शिंदेना शिवसेना आणि अपक्ष मिळून जवळजवळ ५० आमदारांचा पाठिंबा असल्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. त्यानंतर शिंदे गटाने भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. येत्या काही दिवसांमध्ये मुंबई, ठाणे महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होणार आहे. आमदरांच्या या बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसू नये यासाठी शिवसेना तयारीला लागली आहे. आज आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत उद्धव ठाकरे जिल्हाप्रमुखांकडून आढावा घेण्यात आला.

Exit mobile version