Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, मुस्लिम द्वेष निर्माण करण्याचा भाजपा -आरएसएसचा डाव

लोकसभा निवडणुकीचे ४ जून रोजी निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेचच देशभरात मुस्लिमांवरील हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुस्लिमांवरील हे हल्ले भाजपा-आरएसएस आणि त्यांच्या जातीयवादी धर्मांध संघटनांनी आखले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी करत आमच्या मुस्लिम बंधू-भगिनींवरील या नियोजनबध्द हल्ल्यांचा मी तीव्र निषेध करतो. देशात द्वेष, भीती आणि जीवघेणे वातावरण निर्माण करण्याचा भाजपा आरएसएसचा प्रयत्न असल्याच्या आरोपाचा पुर्नरूच्चारही यावेळी एक्सच्या माध्यमातून केला.

प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, काँग्रेस गप्प का? यापैकी दोन हल्ले तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश या काँग्रेसशासित राज्यांमध्ये झाले. पण राहुल गांधी, सोनिया गांधी किंवा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या घटनांचा निषेध केला नाही किंवा त्यांना या हिंसाचारात बळी पडलेल्यांना भेटायला वेळ मिळाला नाही. आपल्या मुस्लिम बांधवांवरील हिंसाचाराकडे लक्ष देण्यास काँग्रेस का टाळाटाळ करत आहे? असा सवालही यावेळी केला.

…तर एवढी भीती का?
पुढे आपल्या ट्विटमध्ये प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मला सांगा, काँग्रेस भाजपपेक्षा वेगळी कशी आणि भाजपा काँग्रेसपेक्षा वेगळा कसा? मी तुम्हाला सर्वांना आधीच सावध केले होते आणि आता मी पुन्हा चेतावणी देत आहे. हे दोन्ही पक्ष एकच आहेत. त्यांना तुमची पर्वा नाही. त्यांना फक्त तुमची मते हवी आहेत असा आरोपही यावेळी केला.

हा कोणत्या प्रकारचा मजबूत विरोधी पक्ष आहे?
पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, यांच्यासाठी मुस्लिम हा फक्त निवडणुकीत जुमल्याप्रमाणे मते मिळवण्यासाठी वापरण्याचा शब्द आहे. मुस्लिम समाज जगला काय मेला काय, यांना काहीही फरक पडत नाही. हे फक्त आपली जुनी संपत्ती, खुर्ची आणि घरे वाचविण्याची लढाई लढत आहेत, देश वाचविण्याची नव्हे अशी खोचक टीकाही केली.

Exit mobile version