Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, जनसुरक्षा विधेयकाविरोधात वंचित बहुजन आघाडी न्यायालयात जाणार

बहुचर्चित महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक काल विधानसभेत आणि आज विधान परिषदेत मंजूर बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकाच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीने या विधेयकाला थेट फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेवर घाला असल्याचे सांगत या विधेयकाच्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले आहे की, हे विधेयक महाराष्ट्राच्या सामाजिक न्यायाच्या ऐतिहासिक वाटचालीवर आघात करणारे असून, या विरोधात आम्ही न्यायालयात लढा देणार असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, लोकशाही मूल्यांवर आणि संविधानावर थेट आघात करणारे आहे. आम्ही या विधेयकाचा संविधानिक मार्गाने विरोध करत राहू. जय फुले. जय शाहू. जय भीम. जय महाराष्ट्र. जय संविधान. जय भारत.” या घोषणांनी आघाडीने आपली भूमिका अधिक ठामपणे अधोरेखित केली आहे.

महाराष्ट्रातील जनतेकडून या विधेयकावर विविध प्रतिक्रिया उमटत असून, आगामी काळात या विधेयकाविरोधातील लढा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

वंचित बहुजन आघाडीने १ एप्रिल २०२४ रोजी विधेयक निवड समितीचे चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र लिहून आपल्या हरकती नोंदवल्या होत्या व मागणी केली होती की, हे विधेयक मागे घ्यावे. वंचित बहुजन आघाडीने या विधेयका विरोधात आपला पवित्रा कायम ठेवला आहे.

Exit mobile version