Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ?…

नरेंद्र मोदींची वृत्ती ही दारुड्याची आहे. दारुड्या दारू प्यायला मिळाली नाही तर काय करतो ? सोनं नानं विकतो, घरदार विकतो. मोदी सुद्धा आता तेच करत आहेत. त्यांनी एअर इंडिया विकली, आता तेल कंपन्या आणि स्थानिक कारखाने विकणार असे म्हणत आहे, अशी घणाघाती टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शेतकरी दिल्लीत उपोषणासाठी बसले होते. तेव्हा मोदी घरामध्ये वीण वाजवत बसले होते. संघाच्या कार्यकर्त्यांना मी विचारतो की, तुम्ही मानवतावाद सांगताय. हा कोणता मानवतावाद आहे की, पंतप्रधान शेतकऱ्यांना भेटायला तयार नाही, असा सवालही यावेळी उपस्थित केला.

पुढे बोलताना ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्याला नितीमत्ता नाही. कोणत्याही पातळीवर जाऊ शकतात अशा माणसांपासून आपण सावध राहिले पाहिजे. कारण ते नुसते खासदार होत नाहीत, तर पूर्ण राज्य आपण त्याच्या हातात देत असतो, म्हणजे आपली मानगुटी आपण त्यांच्या हातात देत असतो. महाराष्ट्रातले शेतकरी नेते मूग गिळून गप्प बसले आहेत. इथे शेतकऱ्यांना शेतकऱ्याचा नेता कधीच मिळाला नाही. जे काही इथे शेतकरी नेते उभे झाले आहेत ते शेतीमध्ये जे पिकतं त्यावर ज्या प्रक्रिया होतात त्या कारखान्यांचे ते मालक आहेत. ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी नाहीत. म्हणून यांच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे असे आवाहनही यावेळी केले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, राष्ट्रवादीने २०१४ मध्ये भाजपाला न मागता पाठिंबा दिला. निवडणूक होऊ नये म्हणून पाठिंबा दिला असे ते सांगत होते. निवडणूक ही या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे. त्यांनी चौकशी होऊ नये म्हणून पाठिंबा दिला होता का नाही याचा खुलासा करावा, अशी मागणीही यावेळी केली.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भाजपा, काँग्रेस आणि उध्दव ठाकरे यांना विचारतो की, तुम्ही तेल्याला उमेदवारी का दिली नाही, तुम्ही धनगर समाजाला का उमेदवारी दिली नाही, तुम्ही माळी समाजाला का उमेदवारी दिली नाही. तुम्ही भटक्या विमुक्ताला का उमेदवारी दिली नाही. उमेदवार हे नात्यागोत्यातले उमेदवार असल्याचेही त्यांनी सांगितले. पक्ष सोडा, विचार सोडा पण या देशातील घराणेशाही संपवा तरच लोकशाही या देशात वाचेल असे आवाहनही यावेळी केले.

प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, राजकीय लोकशाहीला आणि राजकीय सार्वभौमत्वाला टिकवायचे असेल, तर बाबासाहेब म्हणाले होते की, आर्थिक कणा असल्याशिवाय लोकशाही आणि राजकीय सार्वभौमत्व टिकत नाही. या बाबासाहेबांच्या विधानाची आठवणही यावेळी करून दिली.

काँग्रेसवाल्यांना भाजपाला उघडे पाडण्याची संधी होती

भाजपाने राजीव गांधींना बदनाम केले, आता त्यांचे कपडे फाडण्याची वेळ आलेली आहे. फक्त मोदींची नाही तर भारतीय जनता पार्टीचे आणि आरएसएसला देखील उघडे पाडण्याची वेळ आलेली आहे. ती संधी तुम्ही घालवत असल्याचा टोला ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी या वेळी लगावला.

Exit mobile version