Marathi e-Batmya

प्रताप सरनाईक यांची माहिती, लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजना करणार

लोकल रेल्वेतील गर्दीवर उपाययोजनासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा करून ठोस उपाययोजना करणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सांगितले.

ठाणे जिल्ह्यातील  डोंबिवलीवरून कळवा येथे बारावीचा पहिलाच पेपर देण्यासाठी जात असताना मुंब्रा – कळवा स्टेशन दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून सोहम कटारे या विद्यार्थ्याचा १० फेब्रुवारी रोजी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा घटनांवर नियंत्रणासाठी उपाययोजनाबाबत लक्षवेधी विधानसभा सदस्य काशिनाथ दाते यांनी विधानसभेत मांडली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, रेल्वेतील वाढती गर्दी लक्षात घेता, अपघात रोखण्यासाठी बंद दरवाजाच्या रेल्वे सुरू करण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील लोकल रेल्वेतील वाढत्या गर्दीवरील उपाययोजनेबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांच्याशी चर्चा  करून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मेट्रोंची संख्या वाढवणे.जास्तीत जास्त बसेस सुरू करून रेल्वेवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. महिला व दिव्यांगासाठी राखीव डब्या प्रमाणेच परीक्षा काळात विद्यार्थ्यांना  प्रवासात प्राधान्य देण्याबाबतही विचार करू असेही सांगितले.

या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये विधानसभा सदस्य डॉ.ज्योती गायकवाड यांनी सहभाग घेतला.

Exit mobile version