गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर क्षेत्रातून सुमारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त कोकणवासीयांनी एसटीने सुखरूप प्रवासाचा आनंद घेतला. यातुन एसटीला सुमारे २३ कोटी ७७ लाख रुपये उत्पन्न मिळाले. तथापि, आप-आपल्या गावी, वाडया-वस्त्यावर या लाखो कोकणवासीयांना सुखरूप घेऊन जाणारे आमचे बहाद्दर चालक-वाहक त्यांना मदत करणारे यांत्रिक कर्मचारी व मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक -अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत, असेही मंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी सांगितले.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, यंदा गणपती उत्सवासाठी एसटीद्वारे कोकण वासियांसाठी ५ हजार जादा एसटी बसेसची सोय करण्यात आली होती. या बसेस द्वारे १५ हजार ३८८ फेऱ्यातून ५ लाख ९६ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवास केला. अर्थात, एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित आणि अपघात विरहित वाहतूक करून नवा विक्रम प्रस्थापित केल्याचेही यावेळी सांगितले.
प्रताप सरनाईक म्हणाले की, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळामध्ये चालवलेल्या या वाहतुकीमध्ये एसटी प्रशासनाने सुयोग्य नियोजनाच्या आधारे गेल्या अनेक वर्षातील सर्व विक्रम मोडून काढत यंदा तब्बल ५००० बसेसद्वारे ५ लाख ९६ हजार पेक्षा जास्त प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली आहे. अर्थात, यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजार पेक्षा जास्त चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना धैर्याने सामोरे जात एवढी प्रचंड वाहतूक सुरक्षित पार पाडली, ते कौतुकास्पद असल्याचेही म्हणाले.
शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, कोकणातील गणेश भक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसेस ना पर्याय म्हणून चिपळूण,महाड व माणगाव आगारात १०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या असेही यावेळी सांगितले.
