महाराष्ट्रात व्यवसायिक प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक चालकाला व्यवहारिक मराठी येणे अत्यावश्यक आहे. मराठी शिकणे म्हणजे कोणावर बंधन घालणे नव्हे, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा आदर करणे आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. रंगशारदा मंदिर येथे आयोजित हिंदी भाषिकांच्या नवभारतीय शिव वाहतूक संघटनेच्या “वर्धापन दिन व जल्लोष मेळावा” कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “हिंदी भाषिक चालकांना स्वयंस्फूर्तीने मराठी शिकवण्यासाठी हाजी अराफत शेख यांनी केलेला अभिनव उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा पद्धतीने चालक स्वतःहून पुढे येत असतील, तर शासनदेखील त्यांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले.
प्रताप सरनाईक पुढे बोलताना म्हणाले, चालक बांधवांनी मराठी शिकण्यासाठी तीन महिन्यांची मुदत मागितली होती. शासनाने त्यांना तब्बल १०५ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, या कालावधीत जर त्यांनी किमान ‘ व्यवहारिक मराठी ‘ आत्मसात केली नाही, तर १६ ऑगस्टपासून त्यांच्यावर कारवाई करणे अटळ ठरेल, असा इशाराही दिला.
राज्यातील रिक्षा, टॅक्सी, बस आणि ट्रक चालकांच्या योगदानाचा गौरव करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, व्यवसायिक वाहन चालक हा केवळ चालक नसून महाराष्ट्राच्या अर्थचक्राला गती देणारा खरा शिल्पकार आहे. वाहतूक क्षेत्र हे समाजाशी थेट जोडलेले असल्याने चालकांचे बोलणे, वर्तन आणि भाषा यावर संपूर्ण व्यवस्थेची प्रतिमा अवलंबून असते, असेही नमूद केले.
पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, महाराष्ट्र ही संतांची, विचारवंतांची आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची भूमी असल्याचे सांगत त्यांनी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित केले. प्रवासी वाहनात बसल्यानंतर त्याला आपल्या भाषेत संवाद साधता आला पाहिजे. ‘नमस्कार’, ‘कुठे जायचे?’, ‘किती भाडे होईल?’ एवढे तरी व्यवहारिक मराठी प्रत्येक चालकाला आले पाहिजे,” अशी अपेक्षाही व्यक्त केली.
प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की, परराज्यातून महाराष्ट्रात येऊन प्रामाणिकपणे काम करणाऱ्या चालकांचे स्वागत करतानाच, स्थानिक भाषा आत्मसात केल्यास प्रवासी, पोलिस, प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी संवाद अधिक सुलभ होईल, गैरसमज कमी होतील आणि सेवा अधिक सुसंस्कृत बनेल, असेही स्पष्ट केले.
नवभारतीय शिव वाहतूक संघटनेने चालकांसाठी मराठी भाषा प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे सांगत, राज्य सरकारच्या माध्यमातून चालकांसाठी विविध कल्याणकारी योजना, प्रशिक्षण उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रम राबवले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
“मराठीला विरोध म्हणून पाहू नका; ती आपुलकीची भाषा म्हणून स्वीकारा. ‘मी मराठी, तू मराठी, मराठी आमचा स्वाभिमान’ ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे,” असे आवाहन करत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपस्थितांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शेवटी “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमाचे आयोजन हाजी अराफत शेख यांनी केले होते.
कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह मोठ्या संख्येने रिक्षा व टॅक्सी चालक उपस्थित होते.
