पुणे येथील कल्याणी नगर भागात करोडपती विशाल अगरवाल यांचा मुलगा वेदांत अगरवाल याने दारू पिऊन त्याच्या पोर्शे या महागड्या गाडीचे रॅश ड्रायव्हिंग करत दोन निष्पापांचा बळी घेतला. तरीही वेदांत अगरवाल यास लगेच जामीन मिळावा यासाठी त्याला अल्पवयीन असल्याचे दाखविण्यात आले. यावरून महाराष्ट्रात आणि पुण्यात पोलिसांच्या भूमिकेवरून आणि बाल हक्क न्यायालयाने दिलेल्या निकालावरून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुणे येथील पोर्शे गाडीचा मालक करोडपती विशाल अगरवाल याचा मुलगा वेदांत अगरवाल याने भरधाव वेगाने गाडी चालवित दोघांना उडविले, यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन भारत निर्माण करत आहेत. एकाबाजूला एक भारत हा करोडपती-अरबपतींचा भारत. करोडपतीचा मुलगा जो दारू पिऊन ज्यात पोर्शे सारख्या महागड्या गाडीतून करोडपतीच्या मुलाने एखाद्याचा बळी घेतला तरी त्याला लगेच अल्पवयीन दाखवायचे आणि त्याची लगेच सुटका करून घ्यायची. पण असाच एखादा अपघात गरीब असलेल्या ट्रक डायव्हर, रिक्षा ड्रायव्हर याच्यासोबतही असेच का करत नाही. अरबपती आणि करोडपतींसाठी वेगळा आणि गरीबांसाठी वेगळा न्याय अशा पध्दतीचा भारत निर्माण करत आहेत.
राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, हेच आम्हाला थांबवायचे आहे. देशातील गरिब असो किंवा करोडपती असो त्याला न्याय हा एकाच पातळीवर द्यायला हवा असे सांगत ही न्याय संकल्पनाच आम्हाला रूजवायची आहे. या दोन भारताच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले तर त्यांचे उत्तर आले की, मी सगळ्यांना गरीब बनवू का? असे उत्तर दिले. परंतु महत्वाचा मुद्दा आहे की, गरीब असो किंवा अरबपती असो सगळ्यांना एकच न्याय मिळायला हवा. त्याचसाठी आम्ही लढत आहोत, अन्यायाच्या विरोधात आमचा लढा आहे असा उपरोधिक टोलाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला.
https://x.com/RahulGandhi/status/1792918388617994458
