Marathi e-Batmya

राहुल गांधी यांची खोचक टीका, परिक्षा रद्द करून विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने चिरडून टाकली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी (१२ मे, २०२६) नीट (यूजी) २०२६ परीक्षा रद्द केल्याप्रकरणी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनले असल्याची टीका केली.

राहुल गांधी म्हणाले की, २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने “या भ्रष्ट भाजप राजवटीने चिरडून टाकली आहेत”.

X वर हिंदीतील एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, “नीट २०२६ परीक्षा रद्द करण्यात आली आहे. २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत, त्याग आणि स्वप्ने या भ्रष्ट भाजप राजवटीने चिरडून टाकली आहेत. काही वडिलांनी कर्ज घेतले, काही मातांनी आपले दागिने विकले, लाखो मुलांनी रात्रभर जागून अभ्यास केला आणि त्या बदल्यात त्यांना पेपरफुटी, सरकारी दुर्लक्ष आणि शिक्षणातील संघटित भ्रष्टाचार मिळाला.”

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “हे केवळ अपयश नाही, तर तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे,” अशी टीकाही यावेळी केली.

भाजपावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, “प्रत्येक वेळी पेपर माफिया सहीसलामत सुटतो, तर प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागते, आता पुन्हा एकदा लाखो विद्यार्थ्यांना तोच मानसिक ताण, आर्थिक भार आणि अनिश्चितता सहन करावी लागेल, जर एखाद्याचे भविष्य कठोर परिश्रमाने नव्हे, तर पैसा आणि वशिल्याने ठरत असेल, तर शिक्षणाला काय अर्थ उरेल?” असा सवालही यावेळी उपस्थित केला.

शेवटी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधानांचा तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनला,” असल्याची टीका केली.

Exit mobile version