Marathi e-Batmya

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पोहोचली बिहारमध्ये, भाजपावर टीकास्त्र

नुकतेच बिहारमधील इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाह्यला मिळाल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा आज बिहारमध्ये प्रवेशली. यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर टीकास्त्र सोडताना मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर यु टर्नच्या भूमिकेवर कोणतेही भाष्य करण्याचे टाळले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, भाजपा आणि राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून देशातील धर्मांमध्ये वाद निर्माण केला जात आहे. देशाच्या एकतेला विभाजीत करू पहात आहेत. तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस पक्षाकडून देशातील समाजासमाजात प्रेम, सन्मान, बंधुभाव निर्माण करण्याचे अभियान राबविले जात आहे. सामाजिक न्यायाची भूमी म्हणून नेहमी बिहारकडे पाह्यले जात आहे. त्यामुळेच देशातील जनता बिहारमधील नागरिकांकडे जाणीवपूर्वक लक्ष देत असल्याचेही सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, देशाची संपत्ती फक्त मुठभर कोट्याधीश नागरिकांच्या हाती सोपोविली जात आहे. तर देशातील गरिब लोकांना आर्थिक आणि सामाजिक न्याय दिला जात नाही. त्यामुळेच देशातील गरिब, कष्टकरी नागरिकांना आर्थिक, सामाजिक न्याय देण्यासाठीच भारत जोडो यात्रेच्या नावात न्याय हा शब्द समाविष्ट करण्यात आल्याचे सांगितले.

नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, सद्यपरिस्थितीत देशातील गरिब, कामगार आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार मदत करत नाही. बँकांचे दरवाजे गरिबांसाठी श्रमिकांसाठी बंद करण्यात आले आहेत. मात्र उद्योगपतींसाठी बँकाचे दरवाजे सताड उघडे ठेवले जात आहेत. सामाजिक आणि आर्थिक न्यायाशिवाय देशाचा विकास कधीही होऊ शकत नाही. तरीही भाजपाकडून जाणीवपूर्वक आर्थिक विकासाच्या पोकळ गप्पा मारल्या जात आहेत अशी टीकाही केली.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रेने पश्चिम बंगालच्या सिलगुडी मधून बिहारमध्ये प्रवेश करत राष्ट्रीय जनता दलाचा प्रभाव असलेल्या सीमांचल प्रदेशात प्रवेश केला आणि त्या भागातूनच आपल्या यात्रेला सुरुवातही केली.

Exit mobile version