Marathi e-Batmya

राज ठाकरे यांचे पंतप्रधानांना पत्र, हयातीत नाही किमान मरणोत्तरी…

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री उशीरा निधन झाले. त्याच्या भारतीय अर्थव्यवस्थेतील योगदानाची दखल घेत राष्ट्रीय दुःखवटाही जाहिर केला. राज्य सरकारनेही आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ऱतन टाटा यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी शिफारस राज्य सरकारने केली. राज्य सरकार पाठोपाठ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारकडून देण्यात येणारा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कारावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित काही गोष्टींबाबत अपेक्षा व्यक्त केली.

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेले पत्र एक्स या प्रोफाईलवर ट्विट केले आहे.

राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणाले की, ज्येष्ठ उद्योगपती आणि गेल्या ३ दशकांत भारतीय उद्योगजगताला आकार देणारे रतन टाटा यांचं निधन झालं. रतन टाटांना तुम्ही पण जवळून ओळखायचात, आणि त्यातून तुमच्याही लक्षात आलं असेल की, कुठल्याही मानसन्मानाची अपेक्षा न ठेवणारी व्यक्ती होती. पण भारतीय उद्योगजगाला, भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेलं योगदान आणि त्याहून महत्वाचं माणूस म्हणून जे त्यांचं मोठेपण आहे, ते अफाट होतं. अशा व्यक्तीला खरंतर ते हयात असतानाच ‘भारतरत्न’सारख्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करायला हवं होतं. पण आता किमान त्यांना मरणोत्तर भारतरत्न घोषित व्हायला हवी अशी माझी आणि माझ्या पक्षाची इच्छा आणि अपेक्षा आहे, तसच तमाम भारतीयांची देखील याहून काही वेगळी अपेक्षा असेल असं मला वाटत नाही असेही यावेळी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रातून भावना व्यक्त केल्या.

राज ठाकरे पुढे आपल्या पत्रात म्हणाले की, काल रतन टाटांच्या निधनाची बातमी बाहेर आल्यावर अनेक ठिकाणचे कार्यक्रम लोकांनी स्वतःहून थांबवून श्रद्धांजली वाहीली, मुंबईत तर काही ठिकाणी दांडिया देखील अर्ध्यावर थांबवून लोक २ मिनीट स्तब्ध उभे राहीले ! आज सकाळपासुन सोशल मीडियावर तमाम भारतीय उस्फुर्तपणे श्रद्धांजली वाहत आहेत, आणि प्रत्येकाच्या मनातील भाव असा आहे की आपल्या अगदी घरातील कोणीतरी व्यक्ती गेली आहे. अशा व्यक्ती ह्या ‘भारतरत्न’च नाहीत तर काय मग अजून ? असा सवाल करत त्यामुळे याबाबतीत तुम्ही संबंधितांना निर्देश देऊन यावर काही निर्णय घ्याल याची मला खात्री आहे अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त केली.

भारतरत्न पुरस्कारावरून राज ठाकरे पुढे म्हणाले की, तसंच भारत हा रत्नांची खाण आहे. पण या रत्नांचा सन्मान कुठल्याही नागरी सन्मानाने करताना तो त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या योग्य टप्प्यावर व्हावा. मुळात कोणाला मरणोत्तर सन्मान घोषित करायची वेळच येऊ नये. त्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती हयात असताना आणि शारीरिक दृष्ट्या उत्तम अवस्थेत असताना झालेला कधीही चांगला अशी आठवण करून देत आपण अनेकदा बघतो की एखाद्या व्यक्तीचा सन्मान ती व्यक्ती शारीरिक जर्जर अवस्थेत असताना होतो, हे योग्य नाही. या विषयी काही निश्चित धोरण आपण आखाल याची मला खात्री आहे अशी अपेक्षाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून व्यक्त केली.

Exit mobile version