Marathi e-Batmya

रमेश चेन्नीथला यांची टिका,… घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सत्ताधारी पक्षाचा खासदार, एक आमदार व एका केंद्रीय मंत्र्यांने दिलेल्या धमक्या धमक्या गंभीरपणे घेतल्या पाहिजेत. राहुल गांधी यांचा देश-विदेशात नावलौकिक व विश्वासार्हता प्रचंड वाढली आहे. नरेंद्र मोदी व आरएसएस विरोधात लढणारे देशातील ते एकमेव नेते असून राहुल गांधी भाजपासमोर मोठे आव्हान बनले आहेत त्यामुळेच घाबरलेला भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्र पक्षाचे नेते त्यांना सातत्याने जीवघेण्या धमक्या देत आहेत, पण राहुल गांधी अशा धमक्यांना घाबरत नाहीत, अशी स्पष्टोक्ती प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक भाईंदर (पश्चिम) येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC मेंबर व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव बी. एम. संदीप, प्रदेश कार्याध्यक्ष मुझफ्फर हुसेन, आमदार भाई जगताप, माजी खासदार हुसेन दलवाई, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, राजेश शर्मा, जोजो थॉमस, महेंद्र घरत, दयानंद चोरघे, समीर वर्तक, मनोज शिंदे, अविनाश लाड, अनिकेत म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थितीत होते.

रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आज काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष आहे, विधानसभा निवडणुका मविआ एक होऊन लढणार आहे. कोकण विभागात काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करून या भागात काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल व नरेंद्र मोदी सरकार हटवण्याची सुरवात महाराष्ट्रातून होईल असा विश्वासही यावेळी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले की, राहुल गांधी यांनी सातत्याने हिंसेचा विरोध करून ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ सुरु केली. केंद्र सरकारने देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले असताना राहुल गांधी यांनी ४००० किमीची पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलवून टाकले. देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी ही यात्रा काढली. राहुल गांधी हे संयमी नेते आहेत पण भाजपा त्यांच्या जीवावर उठले आहे, त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, ईंट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा दिला.

विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, महायुती सरकारला सत्तेचा अंहकार झाला आहे, सर्वसामान्य जनतेला गाडीखाली चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या वस्त्यावर ५० खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत. भ्रष्ट युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वासही व्यक्त केला.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. आरोग्य विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे, ऍम्ब्युलन्स खऱेदीत घोटाळा केला आहे. हे सरकार कमीशनखोर, खोकेबाज, धोकेबाज सरकार असून या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला आहे. धारावी पुनर्वसनाच्या नावाखाली मुंबईतील कोट्यवधी रुपयांची जागा अदानीला विकली जात आहे. भाजपा युती सरकारने महाराष्ट्र गुजरातला गहाण ठेवला आहे. विरोधी पक्षेते राहुल गांधी यांना जिवघेण्या धमक्या देणाऱ्यांचाही वडेट्टीवार यांनी समाचार घेतला तसेच आगामी निवडणुका लक्षात घेऊन कोकणात काँग्रेस पक्ष वाढवण्यावर भर द्या, जिद्दीने कामाला लागा व कोकणातून जास्तीत जास्त जागेवर विजय मिळवा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदलले आहे. भाजप सरकारच्या काळात लोकांचे जगणे मुष्कील झाल आहे. जनता त्रस्त आहे. जनतेला आता बदल हवा आहे. राज्यात सध्या काँग्रेसमय वातावरण आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार लोकापर्यंत पोहोचवा व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणा.

Exit mobile version