Marathi e-Batmya

रमेश चेन्नीथला यांचा आरोप, सत्ताधा-याकडूंन पोलीस यंत्रणेचा गैरवापर…

२० नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीचा प्रचार आज संपत आहे. पण पराभव समोर दिसत असल्याने सत्ताधारी पक्षांकडून सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात सुरु असल्याच्या तक्रारी काँग्रेस पक्षाकडे येत आहेत. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर केला जात आहे. अत्यंत निष्पक्ष निवडणुका आणि लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली.

यासंदर्भात बोलताना रमेश चेन्नीथला म्हणाले की, पोलीस दलाकडून निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप होत असल्याचे काँग्रेस पक्षाने सातत्याने निदर्शनास आणून दिले होत. त्यानंतर या संदर्भातल्या लेखी तक्रारी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली. काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने देशाच्या मुख्य निवडणुक आयुक्तांची भेट घेऊन पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची मागणी केली होती. काँग्रेस पक्षाची मागणी लक्षातच घेऊन निष्पक्ष निवडणुका पार पडाव्यात म्हणून आयोगाने रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करून संजयकुमार वर्मा यांची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती केली. त्यानंतरही राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षातील बडे नेते पोलिसांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात निवडणूक प्रभावीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आमच्या निदर्शनास येत आहे. हे लोकशाहीसाठी योग्य नाही. काँग्रेस पक्ष या संदर्भात निवडणूक आयोग आणि मुख्य सचिवांकडे लेखी तक्रार करणार आहेच. पण आयोगाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी हस्तक्षेप करावा अशी मागणीही केली.

Exit mobile version