राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह आज जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते-पाटील, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, विविध राजकीय संघटनेमध्ये अतिशय चांगलं काम करणारे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये लोकांचे काम करण्यासाठी सहभागी होत आहेत. नारायण पाटील यांनी आज निर्णय घेतला. लोकांचे काम करण्याची भूमिका त्यांनी करमाळा तालुक्यात बजावली. परंतु, लोकांच्या समस्यात आणि भाजपाच्या धोरणात फरक आहे. त्यामुळेच त्यांनी निर्णय घेतला. मी त्यांच्या निर्णयाचे स्वागत करतो असेही सांगितले.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी १९७२ सली मी या जिल्ह्याचा काही वर्ष पालकमंत्री होतो. त्यावेळी विजयदादा (मोहिते पाटील) जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळी दुष्काळ पडला. या काळात संकटग्रस्त लोकांना काम देण्यासाठी आम्ही एकत्र फिरत होतो. ५ लाख लोकांना या राज्यात दुष्काळातून बाहेर काढण्यात मदत केली. सोलापूर जिल्ह्यातील पाच लाख लोकांना दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी मदत केल्याची आठवणही यावेळी सांगितली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दुष्काळात जनावराला चारा नव्हता. शेवटी आम्ही गुजरातमधून अमूल कृषी संस्थेतील प्रमुख लोकांना आम्ही निमंत्रण दिलं, आणि त्यांच्याकडून गुजरातमधून इथं आम्ही चारा आणला. आणि त्याचवेळेला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी होते. महाराष्ट्रात तुम्ही का मदत केली म्हणून त्या अमूल संस्थेच्या अध्यक्षांवर मोदींच्या राजवटीमध्ये खटला भरला गेला. काय गुन्हा केला त्यांनी…? असा सवालही यावेळी केला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, मी कृषीमंत्री झालो तेव्हा यवतमाळ मधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी समजली. मी तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटलो. त्यांना म्हंटले आपण या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटलो पाहिजे. दुसऱ्या दिवशी दिल्लीवरुन नागपूरला आलो, तिथून त्या शेतकऱ्याच्या घरी पोहचलो. त्यांच्याशी संवाद साधला. आम्ही तेथे विचारलं तर कळालं की, आधीच डोक्यावर कर्ज, त्यात दुष्काळी परिस्थिती आली. अशातच शेतकऱ्यांवर सावकाराने कारवाई करत त्याच्या घराचा लिलाव काढला. या चौहुबाजुने आलेल्या संकटामुळे त्या शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. शेतकऱ्यांचा सन्मान राहिला नाही की ते जीव देतात, तीच परिस्थिती आजसुद्धा आली आहे अशी भीतीही यावेळी व्यक्त केली.
शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, शेतकरी उगाच आत्महत्या करत नाही. त्यालाही जीव प्यारा आहे. पण जगणं जेव्हा अशक्य होतं, ज्यावेळी समाजात स्वाभिमानाने भूमिका घेता येत नाही, त्यावेळी अतिरेक झाल्यानंतर माणूस आत्महत्येच्या रस्त्याला जातो. म्हणून पंतप्रधान मनमोहन सिंग आणि आम्ही ७१ हजार कोटींच्या कर्ज माफीचा निर्णय घेतला. आणि आत्महत्या थांबल्या. आज पुन्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज आहे. यासाठी अनेक सवलती द्यायला पाहिजेत अशी मागणीही यावेळी केली.
शरद पवार म्हणाले की, सरकार विरोधकांना अडचणीत आणत आहेत. झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात टाकला. आता केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकले. त्यांनी लोकांसाठी अनेक चांगली कामे केली. आज तेच केजरीवाल तुरुंगात आहेत कशासाठी तर पंतप्रधानांवर टीका केली म्हणून. दिल्लीत केजरीवाल अतिशय लोकप्रिय आहेत. आज तेच तुरुंगात आहेत. सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जात आहे. आज संकटाचं चित्र देशात दिसत आहे असा इशाराही यावेळी दिला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक लोकशाहीमध्ये येत असते. यावेळीची निवडणूक महत्त्वाची का? आधीच्या वक्त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे. आज काहीतरी देशात वेगळं घडत आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आहे. वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारांवर गदा येईल, संकट येतील. ते होऊ द्यायचे नाही. एखादा हुकूमशाहाचं राज्य असल्यासारखं मोदी राज्यकारभार करतात असा आरोपही यावेळी केला.