Marathi e-Batmya

उध्दव ठाकरे यांचा पलटवार, फडणवीसांचे ते वक्तव्य म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली

भाजपाच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री घरात बसणार नाही आणि तुम्हालाही बसू देणार नाही असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता लगावत हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा युतीचा महापौर आपल्याला बसवायचा असा निर्धार व्यक्त केला. तसेच कितने आदमी थे असा शोले स्टाईल सवाल करत ६५ मेसे ५० निकल गये आणि सगळं गणितच बदललं आणि आता फक्त दोनच राहिले अशी खोचक खोचक टीकाही फडणवीस यांनी उध्दव ठाकरेंवर केली.

देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी फडणवीसांसह भाजपावर हल्लाबोल केला. यासंदर्भात उध्दव ठाकरे यांच्याकडून एक प्रसिध्दी पत्रक काढत जारी करत ही टीका करण्यात आली.

उध्दव ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत भाषण करताना आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेत सत्ता मिळवायची आहे म्हणत बाळासाहेबांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे देवेंद्रनी आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच एकप्रकारे अधोरेखित केले अशी खोचक टीका करत मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आणि कबुली आहे असे स्पष्ट केल्याचा टोमणाही त्यांनी मारला.

भाजपाच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार, या निमित्ताने भाजपाचा खरा चेहरा देवेंद्र यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता याना मतपेटीतून याचे उत्तर देईलच असा घणाघात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केला .

दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या टीकेमुळे आज भाजपाकडून कोणते उत्तर दिले जाणार याबाबत राजकिय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.

Exit mobile version