Marathi e-Batmya

संजय राऊतांचा फडणवीस-पाटील यांना टोला, चोंबडेपणा करू नये

राज्यसभा निवडणूक उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शब्द फिरविल्याचा आरोप केला. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर शरसंधान साधला. त्यास उत्तर देताना सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि संभाजी राजेंना प्रत्युत्तर दिले.

मुंबईत पत्रकार परिषद घेत संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही असा आरोप मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर केला.

त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे चुकीचे असून ती जागा शिवसेनेची आहे.

त्या जागेवर शिवसेनेचा उमेदवार आणायचा हे आधीच ठरलं होते. मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजेंना सांगितलं होतं की पुरस्कृत हा विषय मला सहकाऱ्यांशी बोलावा लागेल. हा सगळा विषय संपलेला आहे. आमच्या पक्षाचा निर्णय उद्धव ठाकरे घेतात. त्यांनी हा निर्णय घेतला आहे असे स्पष्ट केले.

 या मुद्द्यावरून टीका करणारे भाजपाचे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना देखील संजय राऊतांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? त्यांनी २०१९ला आम्हाला दिलेला शब्द मोडल्याबद्दल आधी खुलासा करावा. तेव्हा कुणी शब्द दिला होता आणि कुणी मोडला? असा सवाल केला.

तर यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, हा संभाजीराजे आणि आमच्यातला विषय आहे. इतरांनी चोमडेपणा करू नये. त्यांचा या विषयाशी संबध काय आहे. आमच्या पक्षाचा निर्णय आहे. त्याबाबत त्यांना काय म्हणून आम्ही उत्तर द्यायचे असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी ४२ मतं द्यावीत असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी फडणवीसांना लगावला.
राजकारणात पुढे जायचं असेल, तर राजे, राजघराणी यांना कोणत्यातरी पक्षाचा हात धरावाच लागतो. राणा प्रतापांचे वंशज देखील राजस्थानात कुठल्यातरी पक्षात आहेत. प्रत्येकाचे राजकीय लागेबांधे आहेत. आम्ही त्यांना विनंती केली, त्यांनी स्वीकारली नाही. आमच्यासाठी विषय संपला असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

वाचा

Exit mobile version