Marathi e-Batmya

तेलुगू देसम, जनसेना आणि भाजपाच्या युतीवर शिक्कामोर्तब

दक्षिण भारतातील कर्नाटक वगळता इतर राज्यात भाजपाला अद्याप एके ठिकाणीही शिरकाव करता आला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपासोबतची आघाडी तोडलेल्या तेलगू देसम पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना भाजपाने आगामी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर साद घातली. परंतु नाय-होय, होय-नाय म्हणत चंद्राबाबू नायडू यांनी भाजपाला प्रतिसाद दिला. त्यातच दाक्षिणात्य अभिनेते पवन कल्याण यांनी नव्यानेच स्थापन केलेल्या जनसेना पक्षानेही भाजपाबरोबर युती करण्याचा निश्चय केला. त्यावर अखेर दिल्लीत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि अमित शाह यांच्याशी चंद्राबाबू नायडू यांची चर्चा झाली. त्यानंतर तेलुगू देसम, जनसेना आणि भाजपा यांच्यात युती झाल्याचे भाजपाच्यावतीने जाहिर करण्यात आले.

आंध्र प्रदेशात भाजपा, चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम आणि पवण कल्याण यांच्या जनसेना यांच्यातील युती जाहिर झाल्यानंतर आगामी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूका एकत्रित लढविण्याचे जाहिर करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण २५ जागा आहेत. तर विधानसभेच्या १७५ जागा आहेत. या दोन्ही निवडणूकांसाठी लवकरच जागा वाटपावर चर्चा करण्यात येणार असल्याचे चंद्रबाबू नायडू आणि पवन कल्याण यांच्या जनसेनेने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात सांगितले आहे.

टीडीपी प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले की, वैयक्तिक जागांची ओळख पुढील काही दिवसांत होईल आणि अंतिम संख्या एक-दोन दिवसांत जाहीर केली जाईल. टीडीपी प्रमुख या महिन्याच्या अखेरीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मेगा रॅलीही घेऊ शकतात.

चंद्रबाबू नायडू, जेपी नड्डा, पवन कल्याण आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बैठकीच्या एका दिवसानंतर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तिन्ही पक्षांमधील करार निश्चित झाला. गुरुवारी रात्री अमित शहा यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली आणि दीड तासाहून अधिक वेळ चालली.

या करारानुसार, लोकसभेच्या एकूण २४ जागांपैकी जनसेना आणि भाजपाला जवळपास आठ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश विधानसभेसाठी दोन्ही पक्षांना २८ ते ३२ जागा मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version