Marathi e-Batmya

उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि सपाच्या इंडिया आघाडीचे जागा वाटप जाहीर

मागील काही दिवसांपासून देशातील काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु झालेल्या भारत जोडो न्याय यात्रेला सुरुवात झाल्यापासून आणि जनता दल संयुक्तचे नितीश कुमार यांच्यापासून ते ममता बॅनर्जीपर्यंत अनेक जण इंडिया आघाडीतून बाहेर पडत असल्याचे दिसून आले. त्यामुळे इंडिया आघाडीचे अस्तित्व संपुष्टात येते की काय असे वाटत असतानाच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील समाजवादी पार्टी आणि काँग्रेस दरम्यानचे आगामी लोकसभा निवडणूकीचे जागा वाटप आज जाहिर केले. त्यामुळे इंडिया आघाडीच्यादृष्टीने ही जमेची बाजू असल्याचे सांगण्यात येत आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही सध्या उत्तर प्रदेशातून जात आहे. या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणूकीतील जागा वाटपाच्या अनुषंगाने समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये यशस्वीरित्या लोकसभा मतदारसंघांचे वाटप झाले आहे. त्यामुळे त्याचा फायदा लोकसभा निवडणूकीत होईल असे मानन्यात येत आहे.

समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशात मोठा पक्ष आणि प्रादेशिक पक्ष म्हणून जास्त जागा लढविणार आहे. तर समाजवादी पार्टीने काँग्रेसला १६ जागा सोडण्यात आल्या आहेत. उर्वरित ६३ जागांवर समाजवादी पार्टी आणि इंडिया आघाडीतील सहयोगी पक्ष लढविणार असल्याची माहिती उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

त्याचबरोबर काँग्रेसचे परांपरागत लोकसभा मतदारसंघ म्हणून ओळखले जाणारे रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघात काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक लढविणार आहेत. त्याचबरोबर काँग्रेसकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही उमेदवार उभा करण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशातील जागा वाटपाची चर्चा प्रियंका गांधी-वड्रा आणि समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत झाल्याची माहितीही अविनाश पांडे यांनी दिली.

Exit mobile version