Marathi e-Batmya

निवडणूक हेराफेरीवर वंचित बहुजन आघाडीकडून शरद पवार यांना सवाल

वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील हेराफेरी प्रकरणावरून थेट निशाणा साधला आहे. पक्षाच्या अधिकृत एक्स ‘X’ हँडलवरून शरद पवार यांना पाच थेट प्रश्न विचारले असून, या घडामोडीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही उल्लेख आहे.

वंचित बहुजन आघाडीने विचारलेल्या मुद्द्यांनुसार, शरद पवार यांना दोन व्यक्तींनी भेटून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी करण्याची ऑफर दिली, तसेच १६० जागा जिंकून देण्याचे आश्वासन दिले होते. शरद पवार यांनी सांगितले की, त्यांना या व्यक्तींची नावे माहिती नाहीत. या

संदर्भात वंचित बहुजन आघाडीने विचारले आहे की,

१) शरद पवार यांनी पोलिसांकडे किंवा निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही?

२) जर त्या व्यक्तींची नावे माहीत नसतील, तरी राहुल गांधी यांच्या घरी प्रवेश करताना त्यांची नावे नोंदवहीत नोंदली असतील. ती का जाहीर केली जात नाहीत?

३) पवार यांनी हेतुपुरस्सर या दोघांना राहुल गांधींकडे का नेले?

४) राहुल गांधींनी या घटनेची पुष्टी करावी.

५) राहुल गांधी या सर्व प्रश्नांची पुष्टी करतील का?

या प्रश्नांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वादंग निर्माण झाला असून, निवडणुकीतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.

Exit mobile version