Marathi e-Batmya

एसआयटीच्या स्थापनेनंतर भाजपा मंत्री विजय शाह यांची पुन्हा माफी…

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेशातील भाजपाचे मंत्री विजय शाह यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देत वक्तव्याची चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना केली. त्यावेळी भाजपाचे मंत्री विजय शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागितली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने शाह यांच्या माफीनाम्याला नकार दिला. त्यानंतर, मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी शुक्रवारी (२३ मे, २०२५) आणखी एक जाहिर माफी मागत कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील वक्तव्य हे “भाषिक चूक” असल्याचे दावा केला.

मध्य प्रदेश भाजपाचे मंत्री विजय शाह म्हणाले की, “पहलगाममध्ये झालेल्या भयानक हत्याकांडामुळे मला खूप दुःख झाले आणि मी अस्वस्थ झालो. माझ्या राष्ट्राबद्दल आणि भारतीय सैन्याबद्दल मला नेहमीच अपार प्रेम आणि आदर आहे. मी जे शब्द बोललो त्यामुळे समुदाय, धर्म आणि देशवासीय दुखावले गेले आहेत, ती माझी भाषिक चूक होती,” असे एक्सवरील व्हिडिओ स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे.

तसेच पुढे बोलताना मंत्री विजय शाह म्हणाले की, “माझा हेतू कोणत्याही धर्म, जाती किंवा समुदायाला दुखावण्याचा किंवा अपमान करण्याचा नव्हता. मी अनवधानाने बोललेल्या शब्दांबद्दल मी संपूर्ण भारतीय सैन्य, सिस्टर कर्नल सोफिया आणि सर्व देशवासीयांची मनापासून माफी मागतो आणि पुन्हा एकदा हात जोडून माफी मागतो,” असेही पुन्हा यावेळी म्हणाले.

यापूर्वी २० मे रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विजय शाह यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार तीन सदस्यीय एसआयटीची स्थापना करण्यात आली होती.

एसआयटी २८ मे रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयात आपला अहवाल सादर करेल अशी अपेक्षा आहे.

Exit mobile version