Marathi e-Batmya

स्टुडिओत १७ मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस गोळीबरात मृत्यू

मुंबईतील पवई येथे रोहित आर्य नामक इसमाने १७ अल्पवयीन मुलांना डांबून ठेवल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर पोलिसांनी १७ मुलांची सुखरूप सुटका केली. तसेच रोहित आर्यने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. छातीत गोळी लागल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात येते होते. उपचारा दरम्यान रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांच्या वतीने अद्याप यावर अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.

चांदिवली येथील रॉ स्टुडिओ नावाच्या एका बंदिस्त इमारतीत आरोपीने १५ वर्षा खालील १७ मुलांना वेबसीरीजचे ऑडिशन घेण्याच्या नावाखाली बोलावले होते. मात्र आज दुपारी त्यांना जेवणासाठी बाहेर पाठविण्याऐवजी सर्वांना डांबून ठेवण्यात आले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पवई पोलिस, साकीनाका पोलिस व अग्निशमन दलाने या मुलांची सुटका केली.

दरम्यान, मुलांना ओलिस ठेवल्यानंतर रोहित आर्य नामक इसमाने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. यात तो म्हणाला आत्महत्या करण्याऐवजी मी एक योजना आखली आहे. मी काही मुलांचे अपहरण मी एक योजना आखली आहे. मी काही मुलांचे अपहरण करून त्यांना ओलिस ठेवले. माझ्या काही साध्या मागण्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तर हवी आहेत. मला काही लोकांशी बोलायचे आहे. त्यांना प्रश्न विचारायचे आहेत. त्यावर जी उत्तरे मिळतील त्यावर प्रतिप्रश्न विचारायचे आहेत. त्याशिवाय मला काहीच नको, मी कोणी दहशतवादी नाही माझी पैशांची मागणी देखील नाही.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या गोळीबारात रोहित आर्यच्या छातीला दुखापत झाली. त्यानंतर त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

सह पोलिस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी म्हटले की प्रथम दर्शनी मुलांना ओलिस ठेवण्यामागे काही प्रलंबित कामामधील थकबाकी कारणीभूत असल्याचे दिसत आहे. दुपारी १.४५ वाजता या घटनेची आम्हाला मिळाली. त्यानंतर पवई येथे पोलिसांचे पथक पोहोचले आणि त्यांनी मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न केले.

रोहित आर्य हे स्वच्छता अभियानाचे प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्त्ये असल्याचे सांगत त्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित लेट्स चेंज नावाचा लघुपट केला होता. त्याचे गुजरातमध्ये प्रदर्शन करून २०१३ मध्ये गुजरातमध्ये त्यांची मोहिम त्यांनी सुरु केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रकल्पाची संकल्पना आवडल्याने त्यांनी गुजरातमध्ये तो राबविण्याचे आदेश दिले होते. असा दावाही रोहित आर्यने यापूर्वी वारंवार केला. शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावे अशी त्यांची संकल्पना होती.

Exit mobile version