Marathi e-Batmya

आदित्य ठाकरे यांची खोचक टीका. ‘हरायचं नाही… निवडणुका घ्यायच्या नाहीत’ हे भाजपाच धोरण

बांगलादेश संबधी भाजपाच्या दुटप्पी भुमिकेवरून भाजपाला आणि सरकारला धारेवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी धरत निवडणुकांना होणाऱ्या विलंबावरून भाजपावर टीकास्त्र सोडलं. आदित्य ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भाजपावर टीका केली.

यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेला असताना मुख्यमंत्री सेलिब्रिटींना घेऊन वर्षावर गणपती साजरा करत होते. तर ही अराजकता पसरलेली असताना राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत ? असा सवाल यावेळी उपस्थित केला.

हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी, भाजपचे नेतेही हैराण- आदित्य ठाकरे

भारत बांग्लादेश क्रिकेट सामन्यांच्या आयोजनाची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित केली जात असल्याप्रकरणी पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘मला परराष्ट्र मंत्रालयातून माहिती हवी आहे. बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले की नाही. भारत-पाक सामन्यावेळी आमची भूमिका स्पष्ट होती. मग आता भाजपानेच सांगितलं होतं हिंदूवर अत्याचार झाले, मग आता ही मॅच का ? बांग्लादेशमध्ये हिंदूवर अत्याचार झाले की नाही झाले ? माध्यमांनीही त्या बातम्या दाखवल्या. काही ठिकाणी दंगलीही झाल्या, भाजपाने इथेही त्याबद्दल आंदोलनं केली. हे झाल्यानंतरही केंद्रात भाजपा, बीसीसीआयमध्येही भाजपा प्रणित असताना क्रिकेट मॅच खेळत आहेत. मग हिंदूंचा वापर फक्त राजकारणासाठी का ? असा सवालही यावेळी उपस्थित केला.

‘हरायचं नाही म्हणून निवडणुका घ्यायच्या नाहीत’ हे भाजपचं धोरण- आदित्य ठाकरे

निवडणुकांना होणाऱ्या विलंबावर आदित्य ठाकरे यांनी बोट ठेवत म्हणाले की, ‘कपिल शर्मा शोवर निवडणूक आयुक्त येणार आहेत, त्यांना माझा सवाल आहे. जम्मू काश्मीर, हरयाणा व महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत नाहीत. हे लोकशाहीला हानीकारक आहे. भाजपाला माहिती आहे की ते हरणार आहेत. त्यामुळे अनेक निवडणूका झालेल्या नाहीत. निवडणुकांना ते घाबरतायत, यामुळे संविधान धोक्यात आहे. भारताची लोकशाही धोक्यात आहे. आणि म्हणून हरायचं नाही म्हणून निवडणुका घ्यायच्या नाहीत हे भाजपाचं धोरण असल्याची टीकाही यावेळी केली.

Exit mobile version