लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरमध्ये उद्या बुधवार ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला प्रसार माध्यमांना बंदी घातली आहे, ही भारतीय जनता पक्षाने पसरवलेली अफवा आहे. संघाच्या शिकवणीप्रमाणे व नेहमी खोटे बोलण्याच्या सवयीमुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धादांत खोटे बोलले आहेत. संविधान सन्मान संमेलन या कार्यक्रमाचे LIVE फीड माध्यमांना काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया हॅंडल्स आणि युट्युबवरून मिळणार आहे, त्यामुळे भाजपाने पसरवलेल्या अफवांवर माध्यमांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केले.
या संदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, संविधान सन्मान संमेलन हा कार्यक्रम रेशीमबागेत कवीवर्य सुरेश भट सभागृहात होत आहे म्हणून बिथरलेल्या भाजपाने खोटी माहिती पसरवण्याचा प्रकार केला आहे. राहुल गांधी हे प्रसार माध्यमांना नेहमीच सामारे जातात. पत्रकार परिषदा घेतात, मुलाखती देतात आणि प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी आवाजही उठवत असतात. याच्या उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षात एकही पत्रकार परिषद घेतली नाही, नरेंद्र मोदी प्रसार माध्यमांना घाबरतात काय? भाजपाच्या काळात माध्यम स्वातंत्र्यांच्या बाबतीत भारत तळाला आहे. माध्यमांना गोदी मीडिया का संबोधले जात आहे. टीव्हीवर होणाऱ्या चर्चा एकांगी होत असतात हे सर्वोच्च न्यायालयाला का म्हणावे लागले, याचे भाजपाने उत्तर द्यावे असेही यावेळी सांगितले.
