Marathi e-Batmya

मातोश्रीवर झालेल्या “त्या” बैठकीतील तपशील शाहनी केला उघड

मराठी ई-बातम्या टीम  

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी आणि सत्ता स्थापनेवेळी बोलणं झालं होतं. मी होतो. निवडणूक देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील. पण नंतर उलटले. त्यांना मुख्यमंत्री व्हायचं होतं. त्यांनी आमच्यासोबत विश्वासघात केला, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी मातोश्रीवरील त्या बैठकीतील चर्चेची माहिती उघड करत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप केला. महाराष्ट्रात निवडणुका होत्या. त्यावेळी मी स्वत: इथे आलो होतो. मी स्वत: शिवसेनेशी संवाद साधला. तेव्हा फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढायचं ठरलं होतं. मुख्यमंत्रीही भाजपचाच होणार हे सुद्धा ठरलं होतं. पण शिवसेना फिरली. त्यांनी हिंदुत्वाशीही तडजोड केली. दोन पिढ्यांपासून ज्यांच्या विरोधात लढले त्यांच्याच मांडीवर जाऊन बसले आणि म्हणतात आम्ही असे म्हणालोच नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना अमित शाह यांनी मातोश्रीवरील त्या बैठकीचा तपशील जाहीर केला.

स्वत: ठरलेल्या गोष्टींवर घुमजाव केलं आणि म्हणतात मी खोटं बोलत आहे. मी खोटं बोलतोय असं थोडावेळ मानूही. पण तुमच्या सभेच्या पाठी जे बॅनर लागत होते, त्यावर तुमच्या फोटोची आणि मोदींच्या फोटोची साईज पाहा. तुमच्या फोटोची एक चतुर्थांश साईज होती. प्रत्येक भाषणात तुम्हाला मोदींचं नाव घ्यावं लागत होते. तुमच्या उपस्थित मी आणि मोदींनी सांगितले होतं की, फडणवीसांच्या नेतृत्वातच निवडणुका लढवल्या जातील आणि एनडीए निवडणूक जिंकल्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील. पण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं होते. तुम्ही आमच्यासोबत विश्वासघात केला सत्तेत बसलात असा आरोपही त्यांनी केला.

मातोश्रीवरील बैठकीत अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीला फक्त अमित शाह आणि आपल्यामध्येच चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जाहीर केली होती. तसेच त्या बैठकीवेळी देवेंद्र फडणवीस हे खोलीच्या बाहेर उभे होते असेही त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. या गोष्टीला जवळपास दोन वर्षे लोटल्यानंतर याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहिल्यांदा भाष्य केले. विशेष म्हणजे यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांनी अनेक वेळा विचारणी केली होती. परंतु त्यावेळी त्यांनी आमच्यात फक्त ठरलंय ऐवढेच सांगत होते.

Exit mobile version