Marathi e-Batmya

मणिपूरमधील भाजपा आमदाराकडूनच पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्ह

साधारणतः दोन महिन्याहून अधिक काळ मणिपूर मधील हिंचासार काही केल्या शांत होण्याची चिन्हे दिसून येत आहे. अखेर मणिपूरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला दट्ट्या दिल्यांनंतर व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा शासित मणिपूरबरोबर काँग्रेसची राजवट असलेल्या राज्यांना लक्ष्य करत विरोधकांवरच टीका केली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मणिपूरमधील भाजपाचे आमदाराने न्युजलाँड्री या संकतेस्थळाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेबद्दल आणि प्राथमिकतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केले. सध्या मुलाखतीची ध्वनिफित मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यमांवर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे.

मणिपूरमधील सत्ताधारी भाजपाचे आमदार पाओलीनलाल हाओकिप म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना मणिपूर हिंसाचारावर मौन सोडण्यासाठी एक व्हिडीओ व्हायरल व्हावा लागला हे खूप दुर्दैवी आहे. अशाप्रकारचा हिंसाचार होत असेल, तर ७९ दिवसांचा उशीर तर सोडाच, पण एखादा आठवडा उशीर होणे हाही खूप मोठा काळ आहे. ही शांतता बधिर करणारी आहे.

पाओलीनलाल हाओकिप पुढे बोलताना म्हणाले, कुकी समाजाचा प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्राधान्यक्रम चुकत आहे. मी स्वतः पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्याआधी कुकी समाजाच्या प्रतिनिधी मंडळाच्या भेटीसाठी प्रयत्न केला होता. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आजही आम्ही पंतप्रधानांच्या भेटीसाठी वेळ मिळण्याची वाट पाहतो आहे. जेणेकरून आम्ही त्यांना मणिपूरमधील परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आणून देऊ शकू, सांगितलं.

आमदार पाओलीनलाल हाओकिप पुढे म्हणाले, माझ्या समाजाचा नेता म्हणून ही शांतता माझ्यासाठी खूप निराशाजनक आहे. एक देश म्हणून आपल्या सर्वांना पक्षांच्या पलिकडे जाऊन विचार करायला हवा. आज ज्या कुकी समाजावर अत्याचार होत आहे, त्यांच्याविरोधात वातावरण निर्माण करण्यात मणिपूरचे मुख्यमंत्री आघाडीवर होते. आम्हाला राज्य सरकारकडून न्यायाची कोणतीही अपेक्षा नाही असे मतही व्यक्त केले.
पाओलीनलाल हाओकिप यांच्यासह मणिपूरमधील कुकी समाजातील १० आमदारांनी मुख्यमंत्री बिरेन सिंह आदिवासींचं रक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप केला. तसेच राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी वेगळ्या प्रशासनाची मागणी केली आहे. ३ मे रोजी मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई समाजाने कुकी समाजावर सुरू केलेल्या अत्याचाराला विद्यमान राज्य सरकारचं पाठबळ असल्याचा आरोपही केला.

पाओलीनलाल हाओकिप म्हणाले, मणिपूरमधील जो व्हिडीओ व्हायरल झाला त्यातील घटनेसारख्या चार घटना घडल्या आहेत. या घटनांची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्री बिरेन सिंह, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान मोदींना व्हिडीओची आवश्यकता आहे का? अशा अमानवी घटनांविरोधात कारवाई करणे राज्य सरकारची जबाबदारी नाही का? व्हिडीओ समोर आल्यावर आपल्याला या घटनेविषयी कळाल्याचं मुख्यमंत्री बिरेन सिंह सांगतात. मात्र, ही घटना दोन महिन्यांपूर्वीच घडली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री असं बोलून या घटनांवर सारवासारव करत आहेत अशी टीका केली.

पाओलीनलाल हाओकिप पुढे बोलताना म्हणाले, सामान्य नागरिक तर सोडाच, पण एक लोकनियुक्त आमदार असून मला इंफाळमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी मला सुरक्षित वाटत नाही, अशी खंत व्यक्त केली.

Exit mobile version