राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या गीग कामगारांना सुविधा मिळण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधेयक आणावे तसेच भिवंडीसाठी लॉजिस्टिक पार्क जाहीर करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. आमदार शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात सोमवारी पत्र लिहिले आहे.
यासंदर्भात माहिती देताना आमदार रईस शेख म्हणाले की, राज्यात ३५० प्लटफॉर्मवर ५ लाख गीग कामगार कार्यरत आहेत. मुंबई महानगर क्षेत्रामध्ये या कामगारांची संख्या मोठी आहे. या कामगारांना सामाजिक सुरक्षेसारख्या कोणत्याच सुविधा मिळत नाहीत.
आमदार रईस शेख म्हणाले की, या गीग कामगारांमध्ये जेन झी युवकांची संख्या मोठी आहे. कामांचा योग्य मोबदला व सुविधा मिळत नसल्याने त्यांच्यामध्ये असंतोष खदखदत आहे. गीग कामगारांना सुविधा देण्यासंदर्भात आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शासकीय विधेयक आणावे, अशी मागणीही केली.
पुढे बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, भिवंडी हे आशियातील सर्वात मोठे वेअरहाउसिंग हब आहे. लॉजिस्टीक क्षेत्र भिवंडीची आज ओळख बनली आहे. मात्र या व्यवसायासाठी येथे पायाभूत सुविधांची वानवा आहे. त्यामुळे रोजगार वाढीला खीळ बसली आहे.
वर्ष २०२५ च्या पावसाळी अधिवेशनात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भिवंडीला लॉजीस्टीक पार्क देण्याची घोषणा केली होती. मात्र त्या घोषणेचे पुढे काही झाले नाही. आगामी अर्थसंकल्प सादर करताना वित्तमंत्री या नात्याने आपण भिवंडीमध्ये लॉजीस्टीक पार्क स्थापन करण्याची घोषणा करावी, अशी विनंती आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रामध्ये केली आहे.
Promises made in 2025 cannot be forgotten in 2026! I’ve written to Hon. CM @Dev_Fadnavis Ji to take action this Budget Pass a Bill for 5L+ #GigWorker. Fund the #Bhiwandi Logistic Park. Our youth need rights, and our city needs infrastructure. Will the Govt stand with the people? pic.twitter.com/cRWwqY5GGZ
— Rais Shaikh (@rais_shk) February 12, 2026
