Marathi e-Batmya

जरांगे पाटील यांच्या तब्येतीवरून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केली ही मागणी

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विशेष म्हणजे हे आंदोलन सुरु केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि औषधे न घेता आमरण उपोषण सुरु केले असून आज उपोषण आंदोलनाचा पाचवा दिवस आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांचे प्राण वाचविण्याची भूमिका राज्य सरकारची नसल्याचा आरोप केला.

तर काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर राज्य सरकारने तात्काळ निर्णय घेऊन त्यांचे उपोषण सोडवावे अशी मागणी केली.

तसेच या दोन्ही नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या खालावत चालल्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली.

उद्धव ठाकरे आपल्या प्रसिध्दी पत्रकातून म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असताना सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजित एकतेला ते चुड लावत आहेत. तसेच मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे ते त्यांना मिळायला हवे असे सांगत ओबीसी आदिवासीसह इतर समाजाच्या ङक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला हक्काचे आरक्षण द्यावे अशी मागणी केली.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मनोज जरांगे-पाटील उपोषण करीत आहेत, पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करीत आहेत. समाजाच्या मृत देहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे.. पण त्यांचे मन निर्दय आहे. जरांगे-पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

तातडीने निर्णय घेऊन आंदोलन सोडवावे-विजय वडेट्टीवार

तर काँग्रेसचे विजय वडे्ट्टीवार म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे.त्यांचे उपोषण लवकरात लवकर सोडवण्यात यावे ही आमची सरकारकडे मागणी आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का ना लावता मागच्या वेळी उपोषण सोडवताना मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी करावी. जरांगे पाटलांच्या तब्येतीची स्थिती बघता तातडीने निर्णय घेऊन आंदोलन सोडवावे ही आमची सरकारकडे मागणी आहे.

Exit mobile version