Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, निवडणूक आयोगात फूट पाडून राजकीय लाभ घ्यायचाय

फोडा आणि राज्य करा हेच भाजपा, काँग्रेसचे धोरण आहे. हरियाणा आणि महाराष्ट्रात भाजपाने सर्वोच्च न्यायालयाचा क्रीमीलेअर आणि अनुसूचित जातींमधील वर्गीकरणाचा चुकीचा निर्णय लागू केला असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, भाजपा आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षांना अनुसूचित जातींमध्ये विभागून त्यांचे एक होणे थांबवायचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा महान संदेश आणि त्यांच्या अफाट शक्तीची त्यांना भीती वाटते. निवडणूक आयोगात फूट पाडून भाजप आणि काँग्रेसला राजकीय लाभ घ्यायचा असल्याचा आरोप केला.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अनुसूचित जाती अजून किती दिवस भाजप आणि काँग्रेसच्या जाळ्यात अडकणार आहेत हा खरा प्रश्न आहे. भाजप आणि काँग्रेस या दोघांनीही अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या समूहासाठी असलेल्या कल्याणकारी योजना आणि सवलती काढून घेत अनेक दशकांपासून वंचित ठेवले आहे. म्हणून तुम्ही स्वतंत्र आंबेडकरी नेतृत्वाची निवड कराल जे तुम्हाला उत्तरदायी असेल आणि तुमच्या हक्क, अधिकाराचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करण्यास वचनबद्ध असेल, अशी ग्वाहीही यावेळी दिली.

Exit mobile version