Marathi e-Batmya

प्रकाश आंबेडकर यांचा संतप्त हल्लाबोल, “भाजपा = काँग्रेस! तेलंगणात आरक्षण रद्द

तेलंगणा लोकसेवा आयोगाच्या (TGPSC) प्राथमिक परीक्षेमधून आरक्षण हटविण्याचा निर्णय काँग्रेस सरकारने घेतल्यानंतर, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.

ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “भाजपा = काँग्रेस. तुम्हाला अजूनही वाटते का की काँग्रेस देशात आरक्षण वाचवेल? की ते एससी, एसटी आणि ओबीसींना न्याय देईल? काँग्रेसला प्रश्न विचारण्याऐवजी, त्यांना प्रश्न विचारा जे निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला मतांचे विभाजन करणारा पक्ष म्हणत होते आणि काँग्रेसला मते मागत होते ” असा आरोपही यावेळी केला.

यासंदर्भात बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसच्या दलित-बहुजन हिताच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तेलंगणातील घटनाक्रमाबरोबरच कर्नाटकातील काँग्रेस सरकारवर टीका करत पुढे म्हणाले की, २०२३-२०२५ या कालावधीत काँग्रेस सरकारने अनुसूचित जाती-जमातींच्या कल्याणकारी योजनांसाठी राखीव असलेला २५,००० कोटींपेक्षा अधिक निधी वळवून इतरत्र वापरला असल्याचे सांगत हा आहे काँग्रेसचा खरा चेहरा. काँग्रेस आणि भाजपामध्ये काहीच फरक नसल्याची टीकाही यावेळी केली.

शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासूनच सामाजिक न्याय, घटनेतील हक्क आणि आरक्षण यासाठी लढा दिला आहे. अशा निर्णयांनी काँग्रेसच्या “धर्मनिरपेक्ष” आणि “बहुजन हितैषी” चेहऱ्यावरचा मुखवटा गळून पडल्याची भावना व्यक्त केली.

Exit mobile version