नव्या सरकारचा अर्थात महायुतीचा शपथविधी पार पडल्यानंतर विधानसभेच्या अध्यक्ष पदी भाजपाचे आमदार तथा माजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीच निवड पुन्हा एकदा करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडील आमदारांची संख्या कमी असल्याने विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर वगळता दुसरा कोणाचाही अर्ज विधानसभेच्या सचिवाकडे आला नाही. त्यामुळे राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनास सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला चार आमदारांचा शपथविधी पार पडला. त्यावेळी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी कामकाज पत्रिकेतील विधानसभा अध्यक्ष पदावरील निवडीचा कार्यक्रम जाहिर केला.
त्यानुसार विधानसभा अध्यक्ष पदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यावर विरोधक शरद पवार गटाचे जयंत पाटील, काँग्रेसचे नाना पटोले यांनी त्यास अनुमोदन दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याविषयीचा प्रस्ताव मांडला. त्यास भाजपाचे आशिष शेलार यांनी आणि भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अन्य एका आमदाराने अनुमोदन दिले. त्यानंतर प्रथेप्रमाणे सत्ताधारी बाकावरील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहुल नार्वेकर यांच्या आसानाजवळ गेले. त्यानंतर विरोधी पक्षाकडून, जयंत पाटील, नाना पटोले, नितीन राऊत हे ही नार्वेकरांच्या आसनाजवळ पोहोचले. त्यानंतर या पाच-सहा जणांकडून राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षांच्या आसनावर नेवून स्थानापन्न केले.
सत्ताधारी आणि विरोधकांनी सोबत येत राहुल नार्वेकर यांना अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर विराजमान केल्यानंतर नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला.
